कोपरखैरणे येथे दि.बा.मोकाशी यांच्या कथेचा नाट्यरुपी कलाविष्कार सादर
ऐरोली ते काटई मार्गातील अडथळा होणार दूर!
खा. राजन विचारे यांची अधिकारी-पदाधिकाऱ्यांसह ऐरोली-काटई मार्गाची पाहणी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात नव्याने होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरात मोठे प्रकल्प उभे राहत असल्याने या शहरात इतर शहरांमधून नागरिक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. या दृष्टीकोनातून भविष्यात शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नवी मुंबईकरांना होऊ नये यासाठी ‘एमएमआरडीए'मार्फत सुरु असेलेल्या ऐरोली-काटई नाका प्रकल्पाची ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी ८ जुलै रोजी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली.
सदर पाहणी दौऱ्यात खा. राजन विचारे यांनी पहिल्या टप्प्यातील ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्र.४ या मार्गातील ‘टनेल'च्या कामाची पाहणी केली. या भुयारी मार्गाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्ग या २.५७ कि.मी. एलिव्हेटेड मार्गातील अडथळा ठरणारी ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी'ची ४०० केव्ही विद्युत प्रवाह वाहिनी स्थलांतर करण्याचे काम दोन महिन्यात करुन देण्याचे आश्वासन ‘कंपनी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार यांनी दिले आहे. या विद्युत प्रवाह वाहिनीच्या स्थलांतरासाठी १५ ते १६ दिवस काम करण्यास लागणार आहेत. सदरविद्युत वाहिनीतून संपूर्ण मुंबई विभागामध्ये पुरवठा होत असल्याने तांत्रिकदृष्ट्या पुरवठा बंद न करता काम कसे करता येईल? याचा अभ्यास करुन सदरचे काम दोन महिन्यात पूर्ण करुन देऊ असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे खा. राजन विचारे यांनी सांगितले.
ऐरोली ते काटई नाका मार्गाचे काम सुरु करण्यासाठी खासदार राजन विचारे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांचा सन २०१५ पासून पाठपुरावा सुरु होता. या कामाच्या भूमीपुजनानंतर ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून या महत्वाकांक्षी प्रकल्पातील जमीन अधिग्रहण प्रक्रिया असो, वन खात्याच्या परवानग्या असो त्या मिळवून या प्रकल्पातील अडथळे दूर केले आहेत. या होणाऱ्या नवीन मार्गामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातील प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.
याप्रसंगी ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता साखळकर, कार्यकारी अभियंता राठोड, ‘महावितरण'चे अधीक्षक अभियंता गायकवाड, अभियंता संजय वाडवे, नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता सोनावणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बेंडे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, महिला संघटक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, डी. आर. पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, माजी नगरसेवक चेतन नाईक, रविंद्र म्हात्रे, उपशहरप्रमुख विजयानंद माने, मंगेश साळवी, महेश कोठीवाले, प्रकाश चिकणे, चंद्रकांत शेवाळे, अवधूत मोरे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई नाका पर्यंत प्रवास १० मिनिटांचा असणार आहे. त्याचबरोबर सदर मार्ग ठाणे-बेलापूर मार्गाला जोडण्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला असून रॅम्प उभे करण्याचे काम देखील लवकर सुरु होणार आहे. - राजन विचारे, खासदार-ठाणे.
प्रकल्पाची माहितीः
प्रकल्पाचे भूमीपुजन २१ मे २०१८.
पहिला टप्पा ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्र.४, ३.४३ कि.मी. लांबीचा मार्ग, १.६९ कि.मी. लांबीचे दोन टनेल, त्यामध्ये ३+१ आणि ३+१ लेनच्या मार्गिका. प्रकल्पासाठी २३७.५५ कोटी रुपये मंजूर.
दोन्ही टनेलचे ७८ टक्के काम पूर्ण.
दुसरा टप्पा ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्ग २.५७ कि.मी.चा एलिव्हेटेड रस्ता, त्यावर ३+३ लेनच्या मार्गिका. ट्रान्स-हार्बर रेल्वे लाईनवरुन सदर मार्गाची जोडणी. अद्याप २७५.९० कोटींचा खर्च.
दुसऱ्या टप्प्यातील एलिव्हेटेड पुलासाठी लागणाऱ्या पिलरचे काम ६९ टक्के काम पूर्ण.