आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब दीड लाखावरून पाच लाख रूपये

राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना'चे कवच

नवी मुंबई ः महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधा पत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून, या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ आणि वैशिष्ट्ये    
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका आणि अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे. विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करुन योजनेचे विस्तारीकरण करुन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. केंद्र आणि राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रुपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रुपये एवढे करण्यात आले आहे.

दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकरच सुरु
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या १३५६ एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे.

मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण २.५ लाख एवढी असलेली मर्यादा आता ४.५ लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 महात्मा फुले जनआरोग्य योजना याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात लागू करुन सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांत १४० आणि कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. या व्यतिरिक्त २००  रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करुन रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरुन १८४ इतकी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरुन प्रती रुग्ण प्रती अपघात १  लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील आणि देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची सुस्ताई चव्हाट्यावर