ठाणे महापालिका मधील अभियांत्रिकी विभागाला आयुवतांचे सतर्कतेचे आदेश

 १ जुलै नंतर रस्त्याचे कोणतेही काम सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी - बांगर
 

ठाणे : ठाणे महापालिकेने ६०५ कोटींच्या पॅकेज अंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेली कामे ३० जूनपर्यत संपवावीत. १ जुलै नंतर कुठल्याही परिस्थितीत रस्त्यांची कामे चालू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी उर्वरित कामे पावसाळा कालावधीनंतर पूर्ण करण्यात यावी. पावसाळा कालावधीत रस्त्यांची कामे सुरु असतील तर वाहतूक वळविणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर १ जुलैनंतर शहरात एकाही रस्त्याचे काम सुरु नसावे. सुरु असणारी सर्व कामे पूर्ण करुन अथवा संपूर्ण शहरात वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टीने कामांचे नियोजन करावे, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीमध्ये १ जुलै नंतर रस्त्याचे काम चालू आहे, रस्ता खणलेला आहे, काँक्रिट भरुन क्युरिंगसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता खणून तसाच सोडून देण्यात आलेला आहे, अशा सबबी चालणार नाहीत, अशी सक्त ताकीदच आयुवत बांगर यांनी बैठकीमध्ये सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिली. सदर बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे सदर ठिकाणी खड्डेमुक्त पध्दतीने प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर जर खड्डा पडला तर तो  यंत्रणेच्या त्वरित निदर्शनास येणे आवश्यक आहे. त्यासाठी शाखा अभियता पासून ते नगर अभियंता पर्यंत संपूर्ण यंत्रणा पुढील चार महिने त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत राहतील. एखाद्या रस्त्यावर खड्डा पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्या रस्त्यांची डागडुजी तातडीने आणि प्राधान्याने होईल याची दक्षता घ्यावी, असे आयुवत बांगर यांनी बैठकीत सूचित केले. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला जात आहे किंवा कसे यावर यंत्रणेने लक्ष ठेवून तर असावेच तसेच  नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून येणारा फिडबॅक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यावर १२ तासांच्या आत कार्यवाही होईल, ते देखील सुनिश्चित करावे. कोणत्याही परिस्थितीत बारा तासांच्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.

ठाणे शहरातील पावसाळी गटार व्यवस्था ५० मि.मी. पावसापर्यत पाण्याचा निचरा करु शकेल अशा पध्दतीने बनविल्याने एका तासात ५० मि.मी पेक्षा जास्त पाऊस  झाला तर शहरात काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी पाणी खड्डे पडण्याची शक्यता अनेक पटींने वाढते. त्यामुळे पाणी साचलेल्या प्रत्येक ठिकाणी त्वरित जावून पाण्याचा निचरा होईल, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यामध्ये अभियंता विभाग, स्वच्छता विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे आयुवत अभिजीत बांगर यांनी सांगितले.

चेंबर्स वरील झाकणे तातडीने बसवा...
सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या विभागात पायी फिरुन मशीनहोलची झाकणे सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करावी. चेंबर्स वरील झाकणांची दुरुस्ती त्वरित होईल याची दक्षता घ्यावी. कोणतीही दुर्घटना खपवून घेतली जाणार नाही, असेही आयुक्त बांगर यांनी बैठकीमध्ये नमूद केले.

संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये  २४ तास आणि सातही दिवस सर्व यंत्रणा कार्यरत राहिल, याची दक्षता घ्यावी. ‘सुट्टी आहे किंवा रात्र आहे, यामुळे दुरुस्तीचे काम उद्या करतो' अशी सबब खपवून घेतली जाणार नाही. तक्रार आल्यानंतर त्यावर त्वरित कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शहरामधील काही रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी आदि यंत्रणांच्या ताब्यात आहेत. अशा सर्व रस्त्यांवर जर खड्डा दिसला तर त्या यंत्रणेने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वाट न बघता महापालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी. रस्ता कोणाच्याही मालकीचा असो शेवटी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देणे सर्व यंत्रणांची सामुदायिक जबाबदारी आहे. त्यामध्ये महापालिकेने प्रमुख भूमिका निभावणे अपेक्षित आहे. -अभिजीत बांगर, आयुवत- ठाणे महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांना आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट