रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
सामाजिक न्याय दिन म्हणून राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
घणसोलीमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
नवी मुंबई ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या घणसोली शाखेतर्फे २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती ‘सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने सामाजिक न्याय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान २५ जून सकाळी अर्जुनवाडी, घणसोली येथील आदर्श कोचिंग क्लासेस येथे पार पडले.
सदर व्याख्यानात प्रदीप कासुर्डे, गजानंद जाधव व रोहीत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना, ‘सामाजिक न्याय' मिळवून देणारी धोरणे राबवली. हजारो वर्षे ज्ञानार्जनापासून वंचित राहिलेल्या वर्गाला ज्ञानप्रवाहात आणले. त्यासाठी विद्यालय व वसतीगृहांची निर्मिती केली. शिक्षण सक्तीचे केले. वंचित घटकांना निर्णय प्रकियेच्या प्रवाहत आणण्यासाठी वंचित घटकांना आरक्षण दिलं. सक्षम होण्याची संधी दिली. पुर्वी धर्माच्या अंधश्रद्धेतून लहान मुलांना व मुलींना देवाला सोडण्याची म्हणजे जोगत्या-मुरळ्याची दुष्ट प्रथा होती. या अनिष्ट प्रथा जोगत्या-मुरळ्या प्रतिबंधक कायदा करून बंद केल्या. व्यापाराला चालना मिळावी म्हणून सवलती व जागा दिल्या. अशा विविध अंगाने समाजाला दिशा दिली. सामाजिक न्याय माणसांना समान संधी देतोच; सोबत सुरक्षितता देतो, समाजातील दुर्बल घटकांना सक्षम व्हायला वाव देतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘दुर्बल घटकांना आरक्षण' हे आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेली, सामाजिक न्यायाची पाऊल वाट आपल्याला पुरोगामी बनवते. आपणही सामाजिक न्यायाची वाटचाल पुढे चालूया असा संदेश यावेळी देण्यात आला. सदर व्याख्यानप्रसंगी सुनील दोलताडे, सतीश नारनवर, पवन जमदाडे व अशोक निकम यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला.