नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे ‘सिडको'चे आवाहन

सिडको अधिकार क्षेत्रात १५ % पाणी कपात

नवी मुंबई : धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याच्या नवीन साठ्याची निर्मिती झाली नसल्याने ‘सिडको'तर्फे सिडको अधिकार क्षेत्रातील नोड आणि गावांत पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. या दरम्यान नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या धरणात ३ महिने पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध असल्याने पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी २८ जून २०२३ पासून ‘सिडको'तर्फे आपल्या अधिकार क्षेत्रात १५ % पाणी कपात करण्यात येणार आहे.

‘सिडको'तर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणी पुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. ‘सिडको'चे हेटवणे धरण, नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण, ‘एमआयडीसी'चे बारवी धरण आणि ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'चे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे ‘सिडको'कडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, सदर धरण क्षेत्रांतदेखील अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याचा नवीन साठा तयार झाला नसल्याने या सर्व प्राधिकरणांनीही पाणी कपात जाहीर केली आहे.

‘सिडको'तर्फे उपलब्ध पाणी साठ्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून त्यानुसार भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनीपाण्याचा जपून वापर करत सहकार्य करावे, असे आवाहन ‘सिडको'च्या वतीने करण्यात येत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका स्थापत्य विभागाचा गलथान कारभार चव्हाटयावर?