पोलीस, वाहतूक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, एमआयडीसी प्राधिकरणांशी कायम समन्वय ठेवण्याचे निर्देश

पावसाळ्याला सुरुवात; अधिकाऱ्यांनी रहावे दक्ष - आयुक्त नार्वेकर

नवी मुंबई : पावसाळा कालावधीला सुरुवात झाली असून नवी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागासह सर्वच विभागांनी दक्ष राहून आपापली जबाबदारी पार पाडावी. महापालिका क्षेत्रातील पोलीस, वाहतूक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणांशी कायम संवादी राहून परस्परांशी समन्वय राखत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने दिलेले आहेत.


‘शहर आपत्ती व्यवस्थापन समितीे'च्या बैठकांद्वारे पावसाळापूर्व कार्यवाहीचे नियोजन...
‘नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'चे प्रमुख म्हणून यापूर्वीच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वेळोवेळी समन्वय बैठका घ्ोऊन प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळापूर्व कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनिःस्सारण वाहिन्यांची स्वच्छता यांचे दौरे आणि प्रत्यक्ष पाहणी करुन महत्वाच्या सूचना केल्या होत्या. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वतः पाहणी केल्यामुळे पावसाळापूर्व कामांना गती लाभली.


सर्व यंत्रणांना दक्षतेचे आदेश...
१३ जून रोजी संध्याकाळ पासून मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना अधिक प्रमाणात पडणारा पहिलाच पाऊस असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पावसाच्या पाण्याचा योग्य रितीने निचरा होत असल्याबाबत खात्री करुन घेण्याचे विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित करण्यात आले.


महापालिका क्षेत्रात २४.११ मि.मि., मोरबे धरण क्षेत्रात ६.४० मि.मि. पर्जन्यवृष्टी...
१३ जून रोजी सकाळी ८.३० ते १४ जून रोजी सकाळी ८.३० पर्यंत महापालिका क्षेत्रात सरासरी २४.११ मि.मि. पावसाची नोंद झालेली असून यामध्ये बेलापूर विभागात १६.६० मि.मि., नेरुळ विभागात २३.४० मि.मि., वाशी विभागात १४.४० मि.मि., कोपरखैरणे विभागात २२.७० मि.मि., ऐरोली विभागात ३३.६० मि.मि., दिघा विभागात ३४ मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. मोरबे धरण परिसरातही ६.४० मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली असून मोरबे धरणाची पातळी ६९.३९ मीटर इतकी झालेली आहे.


सर्व नियंत्रण कक्ष सुसज्ज, दक्ष राहतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश...
यापुढील काळात महापालिकेच्या आठही विभाग कार्यालयातील तसेच ५ अग्निशमन केंद्रांमधील आपत्ती नियंत्रण कक्ष अधिक दक्षतेने कार्यरत राहतील, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभागनिहाय नेमलेले नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्ती सांगून येत नाह त्यामुळे कायम दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मदतकार्याची सज्जता ठेवण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत.


अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात मोबाईल बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी...
विभागप्रमुखांसह सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन सुरु राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच विशेषत्वाने रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत फोन बंद राहणार नाहीत याबाबत आयुक्तांनी आदेशित केले. त्याअनुषंगाने कोणत्याही सबबी चालणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या आहेत. पाणी साचण्याच्या संभाव्य १४ ठिकाणी पाणी उपसा पंपांची व्यवस्था आणि त्यासाठी आवश्यक इंधनाची व्यवस्था करुन ठेवावी. नागरिकांना स्थलांतरीत करावयाचे झाल्यास त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपातील निवाऱ्याची व्यवस्था सज्ज ठेवावी. त्यांना द्यावयाच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही करावी अशा विविध आवश्यक गोष्टींबाबत पूर्वतयारी करुन ठेवण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत.

नवी मुंबई महापालिका आणि क्षेत्रातील विविध प्राधिकरणे परस्पर समन्वय राखत पावसाळी कालावधीकरिता सज्ज झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अडचणीच्या प्रसंगी मदतकार्यासाठी गरज भासल्यास आपल्या नजीकच्या विभाग कार्यालयात २४ तास सुरु असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी अथवा नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी २७५६७०६० / ७०६१ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १८००२२२३९ / २३१० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टायर रिट्रेडींग प्रकल्पाद्वारे एनएमएमटी उपक्रम स्वयंपूर्ण