२०२४ मध्ये नवी मुंबईमधून विमानोड्डाण

विमानतळ प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे, यासाठी पाहणी केली. नवी मुंबई विमानतळावरुन २०२४ मध्ये प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याअनुषंगाने विमानतळ प्रकल्पातील सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उलवे येथे प्रत्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ७ जून रोजी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर ‘अदानी समुह'च्या वतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ‘एमएमआरडीए'चे आयुवत डॉ. संजय मुखर्जी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, आदि मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळ पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विमानतळाचे भूमीपुजन झाले होते आणि उद्‌घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे, याचा आनंद आहे. विमानतळ प्रकल्प  लवकरच लोकांसाठी खुला होईल, यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी, असा सदर पाहणीचा उद्देश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विविध दळणवळणाची साधने नवी मुंबई विमानतळाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सी-लिंक महत्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहरासाठी सदर प्रकल्प दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.  पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल उभारण्यात येणार असून तेथे ४२ विमाने उभी राहतील. ५,५०० क्षमतेचे कार  पार्किंग असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून विमानतळावर दोन धावपट्ट्या असतील.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तात्काळ दूर कराव्यात आणि २०२४ मध्ये प्रवासी वाहतूक सुरु करावी, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उलवे मधील तिरुपती बालाजी मंदिराचे भूमीपुजन संपन्न