उलवे मधील तिरुपती बालाजी मंदिराचे भूमीपुजन संपन्न
‘तिरुमला तिरुपती देवस्थान'च्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
नवी मुंबई : उलवे, सेक्टर-१२ या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या ‘तिरुमला तिरुपती देवस्थान'च्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध उद्योजक ‘रेमंड समुह'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, ‘तिरुमला देवस्थान'चे अध्यक्ष वाय.व्ही.सुब्बा रेड्डी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ‘तिरुमला ट्रस्ट'चे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भूमीपुजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सर्वांना आनंद देणारा ‘तिरुमला देवस्थान मंदिर'चा भूमीपुजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जाणे जमत नाही. अशावेळी या ठिकाणी येवून ‘तिरुपती बालाजी'चे दर्शन होणार आहे. तिरुपती मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात तिरुपती बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल ‘तिरुमला ट्रस्ट'चे तसेच या पवित्र कामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे, त्या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी आभार मानले.
दरम्यान, ‘तिरुमला ट्रस्ट'चे अध्यक्ष रेड्डी यांनी मंदिराच्या साकारण्याविषयीची यावेळी थोडक्यात माहिती दिली.