बंदिस्त गटारे सफाईचे काम ९७ टक्के पूर्ण; महापालिका आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई मध्ये ५५ नालेसफाई पूर्ण

नवी मुंबई : पावसाळा कालावधीपूर्वी नैसर्गिक नालेसफाई आणि बंदिस्त गटारे सफाई कामांची ठिकठिकाणी जाऊन महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच प्रत्येक ठिकाणी संबंधित विभाग अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

शहरात सुरु असलेल्या नैसर्गिक नालेसफाईच्या कामांना गती देऊन विहीत मुदतीत नालेसफाई पूर्ण केली जावी. नालेसफाई करताना काढला जाणारा गाळ एक ते दोन दिवसात सुकल्यानंतर त्वरित उचलला जावा, असे निर्देश आयुवतांनी घनकचरा व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विभागाला दिले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा भागात ७६ लहान, मोठे नैसर्गिक नाले असून यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील नाल्यांचाही समावेश आहे. या नाल्यांच्या सफाईची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून आत्तापर्यंत ५५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. यानुसार आधी निर्देशित केल्याप्रमाणे २५ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही आयुक्त नार्वेकर यांनी दिले.

दक्षिणोत्तर पसरलेल्या नवी मुंबई शहरात पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडे विस्तारित खाडीकिनारा आहे. डोंगर रांगांकडून वाहत येणारे पाणी नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमातून खाडीला मिळते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये आणि पाण्याचा प्रवाह खाडीच्या दिशेने सहज जावा, याकरिता नालेसफाई केली जाते.

नवी मुंबईचा बराचसा भूभाग समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेला असल्याने भरतीच्या काळात नाल्यांमध्ये आणि होल्डींग पाँडमध्ये उलटे येणारे खाडीचे पाणी तसेच पावसाळा कालावधीत डोंगरातून वाहून येणारी दगड आणि माती यामुळे नाल्यात गाळ साठतो. त्यातही नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता महापालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ठिकठिकाणी नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या लावण्यात आल्या असून नाल्यांमध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. अशा सर्व बाबी लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील लहान मोठ्या ७६ नैसर्गिक नाल्यांतील गाळ काढून नाल्यांमध्ये जास्तीत जास्त पाणी सामावले जावे म्हणून नाल्यांचे पात्र खोल करण्यासाठी नालेसफाई करण्यात येते.

ठिकठिकाणी सुरु असलेली नालेसफाईची कामे योग्य रितीने होत असल्याबाबत खातरजमा करुन घ्ोण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बेलापूर पासून सुरुवात करीत नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. हर्डिलिया कंपनी जवळील लक्ष्मीनगर येथील नाला सायन-पनवेल हायवेखाली असलेल्या कल्व्हर्ट मधून पुढे जात असल्याने या रस्त्याखालील मोठ्या कल्व्हर्टची सफाई व्यवस्थितरित्या केली जावी, असे आयुक्तांनी निर्देशित केले.

तुर्भे पोलीस ठाणे सखल भागात वसलेले असल्याने त्याठिकाणी भरतीची वेळ आणि मोठा पाऊस एकाच वेळी आल्यास पाणी साचते. सदर बाब लक्षात घ्ोऊन त्याठिकाणी तसेच शहरातील पाणी साचण्याच्या संभाव्य १४ ठिकाणी आवश्यक संख्येने पाणी उपसा पंपांची आत्तापासूनच व्यवस्था करुन ठेवावी. एमआयडीसी क्षेत्रातीलही नालेसफाई काटेकोरपणे होण्यासाठी आयुवतांनी तेथील नालेसफाई कामांची पाहणी केली. नालेसफाईतून निघणारा गाळ वाहून नेणे सोयीचे व्हावे म्हणून तो सुकण्यासाठी काठांवर ठेवला जातो. सदर गाळ ४८ तासात उचलावा, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

बंदिस्त गटारे सफाईचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित ५ टक्के काम काही ठिकाणी आलेल्या अडचणींमुळे करता आलेले नाही. सदर कामांकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते काम पूर्ण करुन घ्यावे, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

दरम्यान, पाहणी दौऱ्यामध्ये काही ठिकाणांवर अचानक थांबत आयुक्तांनी गटारांची झाकणे उघडून बंदिस्त गटारांची साफसफाई कशा रितीने झाली आहे याची प्रत्यक्ष पाहणी केली. काही जागांवर गटारांच्या काठाशी गाळ दिसल्याने त्यांनी तो त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. यापूर्वी बंदिस्त गटारे सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ४३ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बंदिस्त गटारे सफाईप्रमाणेच नैसर्गिक नालेसफाई कामातही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रात्री बारानंतर हवेत रसायने सोडण्याचे प्रकार सुरु