अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दर्जावर परिणाम

एपीएमसी बाजारात  हलक्या प्रतीचा कांदा दाखल

वाशी ः मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकणी अवकाळी पाऊस पडत आहे.या पावसामुळे ३० % ते ४० % कांदा भिजला असून, त्याचा कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई वृÀषि उत्पन्न बाजारात (एपीएमसी) ७० % ते ८० % हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत आहे. कांद्याचा दर्जा खालावला असल्याने त्याचा दरांवर परिणाम होऊन कांदा दर घसरले आहेत. २ मे रोजी घाऊक एपीएमसी बाजारात कांदा प्रतिकिलो ५ ते १० रुपये दराने विक्री झाला.

गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी बाजारात सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात. त्यामुळे पावसाळ्याआधीच कांदे साठवणुकीला सुरुवात होते. कांद्याला चढे दर मिळतील या अपेक्षेने चाळीतील कांदा साठवणुकीला सुरुवात झाली आहे. मात्र, यामध्ये सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याची साठवणूक केली जात आहे. सध्या एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात ७० ते ८० %  हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत असून, त्यातही अवकाळी पावसाने कांदे भिजल्याने ३० ते ४० %  कांदे खराब होत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात हलक्या दर्जाचा कांदा दाखल होत आहे. २ मे रोजी एपीएमसी बाजारात कांद्याच्या १४९ गाड्या दाखल झाल्या आहेत. परंतु ग्राहक कमी असून शेतमालाला उठाव कमी आहे. परिणामी कांद्याचे दर घसरले आहेत, असे मत कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले. मागील आठवड्यात उच्चतम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ८ ते १२ रुपयांवर होता, तो आता ५ ते १० रुपये तर पाल्याचा कांदा ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फोर्टीस हॉस्पिटल मध्ये डायबेटिक फुट क्लिनिक सुरु