उद्योग मंत्री उदय सामंत यांची उद्योग-कामगार विभागाला सू्‌चना

 एमआयडीसी मधील बोगस माथाडी, गुंडांच्या कारवायांवर अंकुश घाला

 नवी मुंबई ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रातील विविध उद्योगात स्थानिक गुंडगिरी आणि बोगस माथाडी कामगार यांच्याकडून होणारा त्रास थांबण्यासाठी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणे, नोंदीत माथाडी कामगारांनाच हक्काची कामे मिळणे तसेच शासनाच्या कामगार विभागाच्या६ सप्टेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय तसेच माथाडी बोर्डाचे अधिकारी, युनियन प्रतिनिधी आणि संबंधितांची संयुक्त बैठक घेणे, नोंदीत कष्टकरी माथाडी कामगार आणि उद्योजकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी राज्याच्या उद्योग तथा कामगार विभागाला दिल्या आहेत.

एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांकडून माथाडी कायद्याची अंमलबजावणी होणे, विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांना हक्काचे काम मिळणे, कामाची लेव्हीसह मजुरी माथाडी बोर्डात भरणा होण्याबद्दलचे निवेदन ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते तथा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना सादर केले होते. त्याअनुषंगाने ना. उदय सामंत यांनी संबंधितांची २६ एप्रिल मुक्तागिरी या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ना. सामंत यांनी संबंधितांना सूचना केल्या.

एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना आणि कष्टकरी नोंदीत माथाडी कामगारांना बोगस माथाडींकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार-उद्योग विभागाचे अधिकारी, उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संयुक्त बैठक घेण्याबाबत नियोजन करण्याचे आश्वासन देखील ना. उदय सांमत यांनी यावेळी दिले.

सदर बैठकीस ‘माथाडी युनियन'चे सरचिटणीस नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, सुनिल यादव, ‘एमआयडीसी'चे सीईओ डॉ. विपीन शर्मा (व्हीसीवर), अपर कामगार आयुक्त लोखंडे, कामगार उपसचिव दादासाहेब खताळ, उद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधव, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे अध्यक्ष अ. सं. खरात, सहाय्यक कामगार आयुक्त-आयर्न बोर्डाचे अध्यक्ष राजेश आडे, कामगार विकास आयुक्त्कापड बोर्डाच्या अध्यक्षा सुनिता म्हैसकर, कामगार उपायुक्त, ग्रोसरी बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग माथाडी मंडळाचे अध्यक्ष संदेश आयरे, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे सचिव सुर्यकांत डोबरियाल, आदि उपस्थित होते.

प्रांरभी बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी क्षेत्रात स्थानिक गुंडगिरी आणि बोगस माथाडी यांच्याकडून उद्योजक तसेच नोंदीत माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबतची सविस्तर माहिती दिली. एमआयडीसी क्षेत्रात माथाडी कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. बोगस माथाडी आणि काही तथाकथित कामगार नेत्यांकडून उद्योजक आणि नोंदीत माथाडी कामगारांना त्रास देत सुरु असून ते थांबणे आणि उद्योग वाढविणे गरजेचे आहे. दरम्यान, शासनाच्या माथाडी कायद्यान्वये नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनाच कामे मिळण्याबद्दलची कार्यवाही उद्योग-कामगार विभागाने काटेकोरपणे करण्याच्या सूचना केल्याबद्दल नरेंद्र पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागीय कार्यशाळेत स्वच्छता विचार मंथन