माझी वसुंधरा अभियान...

 

‘माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत  नवी मुंबई महापालिका मुख्यालय आवारात देशी प्रजातींचे वृक्षारोपण

 नवी मुंबई ः ‘माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने नेहमीच नैसर्गिक पंचतत्वांच्या रक्षण- संवर्धनासाठी विविध उपक्रम व्यापक लोकसहभाग घेऊन राबविले असून यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या ‘माझीवसुंधरा' अभियानांतर्गत नवी मुंबई राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले गेले आहे.

सन २०२३-२४ मधील ‘माझी वसुंधरा अभियान'ला सामोरे जाताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने वैविध्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन केले असून २२ एप्रिल या जागतिक पृथ्वी दिवसापासून पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. यावर्षीही जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना ‘आपल्या पृथ्वीमध्ये गुंतवणूक करा' यास अनुसरुन विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने २६ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीसमोरील प्रांगणात अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन-उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कडुनिंबाची वृक्षरोपे लावण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण करताना प्राधान्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात येत असून ‘माझी वसुंधरा अभियान'च्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली हरित नवी मुंबई असे उद्दिष्ट साकारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये कमी जागेत जास्त संख्येने वृक्ष लागवडीची मियावाकी पध्दत शहरी जंगल निर्मितीसाठी वापरली जात आहे. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्ष लागवड करण्यात येत आहेत. महापालिका मुख्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या वृक्षारोपणाचे नियोजन उद्यान विभागामार्फत उद्यान अधीक्षक भालचंद्र गवळी आणि वरिष्ठ उद्यान सहाय्यक विजय कांबळे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हापूस आवक मध्ये घट; निर्यातीवर मोठा परिणाम