जलवाहिनी दुरुस्तीनंतर तब्बल ४२ तासांनी तुर्भेसह नवी मुंबई शहरातील अन्य भागात गढूळ पाणी पुरवठा

तुर्भे येथे गढूळ पाणी पुरवठा; नागरिकांचे हाल

तुर्भे ः जलवाहिनी दुरुस्तीनंतर तब्बल ४२ तासांनी तुर्भेसह नवी मुंबई शहरातील अन्य भागात खूप गढूळ पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यावाचून जनतेचे हाल झाले. याबाबत तुर्भे येथील माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शुध्द पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला. त्यामुळे तुर्भे मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

नवी मुंबई महापालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरता स्थलांतरित करणे, कळंबोली येथे द्रुतगती महामार्गच्या पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणे, तसेच भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची आणि इतर कामे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. या कामासाठी १० एप्रिल या दिवशी सकाळी १० पासून ११ एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्याचे नियोजन होते. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा टप्याटप्याने अल्प दाबाने चालू होणार होता. मात्र, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने २४ तासांचा शटडाऊन ४२ तासांवर गेला. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी पाणी न आल्याने नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले. पाणी पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे जार विक्रीची दुकाने गाठली. पिण्याच्या पाण्याचे २० लिटरचे जार विकत घ्ोतले. अनेकांनी बिसलेरी पाण्याचे बॉक्स मिळेल त्या भावाने विकत घेतले.

१२ एप्रिल या दिवशी पहाटे ४ वाजता तुर्भे परिसरात पाणी आले. मात्र, ते पूर्णपणे गढूळ पाणी होते. थोड्यावेळाने शुध्द पाणी येईल या आशेने रहिवाशांनी पिण्याचे पाणी भरुन ठेवले नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी बंद होण्याची वेळ होत आली असतानाही गढूळ पाणी येत राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. केवळ वापरासाठी पाणी भरुन ठेवले. मात्र, पिण्यासाठी पाणी नसल्याने पुन्हा सकाळी बिसलेरीसाठी दुकाने गाठावी लागली. दरम्यान, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आणि कविताताई पाटील यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शुध्द पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला. त्यामुळे तुर्भेकरांना मोठा दिलासा मिळाल्याने तुर्भेकरांनी त्यांचे आभार मानले.

दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीनंतर आलेले गढूळ पाणी उकळून आणि गाळून पिऊ शकता, असे आवाहन नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभाग द्वारे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई मेट्रोे'ची १७ एप्रिल पासून ‘रेल्वे'कडून अंतिम चाचणी