राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा'चे वाटप
तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधा' वाटपाचा शुभारंभ
पनवेल ः महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा' देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार पनवेल शहरातील तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना ‘आनंदाचा शिधा' देण्यास सुरुवात झाली आहे. ‘भारतीय जनता पार्टी'चे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते नागरिकांना ‘आनंदाचा शिधा'चे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधापत्रिका धारकांना केवळ १०० रुपयात १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लीटर पामतेल असा ‘आनंदाचा शिधा' देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशानुसार पनवेल तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानात त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा' वाटपास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत पनवेल शहरातील तक्का येथील प्रतीक देवचंद बहिरा यांच्या रास्त भाव धान्य आणि किरकोळ रॉकेल विक्री दुकानातून पनवेल शहर भाजपाध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा' वाटपास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक देवचंद बहिरा, दुकानाचे प्रोप्रायटर प्रतीक बहिरा, पत्रकार संजय कदम, रघुनाथ बहिरा, अण्णा भगत, बबन कांबळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तक्का परिसरातील ९०० पेक्षा अधिक लोकांना ‘आनंदाचा शिधा' या योजनेचा लाभ होणार आहे. कोरोना कालावधीमध्ये अनेक गरीब लोकांपुढे पैशाची आणि प्रपंच कसा चालवायचा, असा प्रश्न सतावत होता. पण, शासनाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारक नागरिकांना एक आधार देण्याचे काम होत आहे, असे यावेळी जयंत पगडे यांनी सांगितले.