शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘अन्न सुरक्षा-मानदे प्राधिकरण'तर्फे पाच लाखांचे पारितोषिक जाहीर
‘अन्न-औषध प्रशासन'च्या नवी मुंबई परिमंडळाला पुरस्कार
ठाणे ः केंद्र शासनाच्या ईट राईट इंडिया या उपक्रमाच्या ईट राईट चॅलेंजमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा अन्न-औषध प्रशासन कार्यालयाच्या नवी मुंबई परिमंडळ-२ कार्यालयास पाच लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. जिल्हा अन्न-औषध प्रशासनाच्या परिमंडळ-२च्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सह-आयुक्त एस. एस. देशमुख आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
ठाणे अन्न-औषध प्रशासन कार्यालयाने नवी दिल्लीच्या ‘अन्न सुरक्षा-मानदे प्राधिकरण'च्या ‘ईट राईट इंडिया' या उपक्रमात सन २०२२-२०२३ मध्ये सहभाग घेतला होता. यामधील अन्न सुरक्षेबाबत वेगवेगळ्या देश पातळीवरील ईट राईट चॅलेंज या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, देश पातळीवरील सर्व शहरांच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. याबद्दल ‘अन्न सुरक्षा-मानदे प्राधिकारण'ने नवी मुंबई परिमंडळ-२ या विभागास पाच लाखांचे पारितोषिक घोषित केले आहे.
सदर उपक्रमात अन्न-औषध प्रशासन ठाणे कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांना ईट राईट कॅम्पस, हायजिन रेटिंग प्राप्त करुन घेण्यास मार्गदर्शन केले. अन्न परवाना आणि नोंदणीधारकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या. अन्न व्यावसायकांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले. उच्चजोखिम (हायरिक्स) अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन निरीक्षण मोहिमा राबविल्या. आहारात तृणधान्याचे महत्वाविषयी जन जागृती करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे महत्व समजण्यासाठी ईट राईट स्कूल संकल्पना राबविली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी वर्कशॉप आयोजित केले. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी फोर्टिफाईड फुड आणि तृणधान्यावर आधारित पाककलेसंदर्भात प्रशिक्षण-प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यात तेल, मिठ, साखर कमी वापर तसेच फोर्टिफाईड फुड, तृण धान्याचे आहारातील महत्व, वापरलेल्या खाद्य तेलाचा पुर्नरवापर टाळणे आदिंबाबत कार्यालयाच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
सदर विविध उपक्रमाची केंद्रीय पातळीवर दखल घेऊन प्राधिकरणाने नवी मुंबई परिमंडळाला पाच लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. ठाणे अन्न-औषध प्रशासन कार्यालयाचे सह-आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा नोडल अधिकार अ. घि. पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी रा. रा. ताकाटे आणि अन्न सुरक्षा अधिकारी दि. स. हरदास यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाणे अन्न-औषध विभागाच्या सदर विविध उपक्रमाबद्दल व त्यांना जाहीर झालेल्या पारितोषिकाबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.