आजपर्यंतच्या सर्वच सरकारांकडून माथाडी कामगारांची बोळवण -नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त माथाडी कामगारांची सभा संपन्न

नवी मुंबई ः माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या वतीने एपीएमसी मधील माथाडी भवन
येथे २३ मार्च रोजी माथाडी कामगारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘माथाडी युनियन'चे सरचिटणीस तथा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, ‘युनियन'चे
कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, कायदेशीर सल्लागार ॲड. भारती पाटील, पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, ‘युनियन'चे उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, सेक्रेटरी मनोज जामसुतकर, व्यापारी प्रतिनिधी मयुर सोनी, राजपुरे, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, बीडचे रवि शिंदे आदिंसह माथाडी कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे. मी कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते. आजपर्यंतच्या सरकार कडून माथाडी कामगारांचे हित कुठेच बघितले गेले नाही. त्याचा निषेध म्हणून यावेळच्या स्व. आमदार
अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोकप्रतिनिधीला बोलावण्यात आले नसल्याचे नरेंद्र पाटील यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उद्‌ध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जाते; पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री उद्योगपतीच होते आणि आताचेही आहेत, मग कामगारांना न्याय कसा मिळणार अशी खंत नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यवत केली. अण्णासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्याचे उदाहरण विधी मंडळ सभागृहात कामगारांसंदर्भात कोणताही कायदा पास करताना दिले जाते. हेच खरे अण्णासाहेबांच्या अभेद्य चळवळीचे यश आहे. त्यामुळे सर्वांनी संघटीत होवून माथाडी कामगार चळवळीसमोर आता जी ज्वलंत आव्हाने उभी आहेत ती नष्ट करण्यासाठी आपल्या संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

माथाडी कामगार चळवळ अत्यंत वाईट दिशेने आणि रस्त्याने वाटचाल करीत आहे. त्यासाठी ती बदलण्याकरिता आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत. अण्णासाहेबांच्या ऐतिहासीक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपली अभेद्य एकजूट कायम राहिली पाहिजे, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित कामगारांना केले. सदर सभेचे सूत्रसंचालन ‘युनियन'चे जनसंपर्क अधिकारी तथा संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवरात्रौत्सवात आगरी-कोळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार