जागतिक जलस्थिती आणि पर्यावरणस्थिती पाहता जलबचतीचे आवाहन

महापालिका आयुवतांचे जलबचतीचे आवाहन

नवी मुंबई ः जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेमार्फत १६ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून जलजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाजमाध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधला असून नागरिकांना २२ मार्च रोजीच्या जागतिक जलदिनाच्या शुभेच्छा देत सध्याची जागतिक जलस्थिती आणि पर्यावरणस्थिती पाहता जलबचतीचे आवाहन केले आहे.

 ग्लोबल वॉर्निंगमुळे एका बाजुला पावसाचे प्रमाण घटत असून दुसऱ्या बाजुला तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते चाललेले दिसत असल्याचे नमूद करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्याकडे उपलब्ध पाणीसाठ्याचा परिणामकारक आणि संयुक्तिक वापर करण्याची गरज विषद केली आहे.

पाण्याला जीवन म्हणतात, म्हणूनच आपण पाणी वाचवू शकलो तर जीवन वाचू शकेल. सदर बाब लक्षात घ्ोऊन प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करावेत. दैनंदिन जीवनात अनेक साध्या साध्या गोष्टींतून आपण जलबचत करु शकतो. यामध्ये, घरच्या गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये. तसेच पाईप लावून गाड्या धुवू नयेत. दाढी करताना किंवा बाथरुममध्ये सतत नळ सुरु ठेवण्याची आपली सवय बदलावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. अनावश्यक पाणीसाठा करु नये आणि केल्यास पाणी शिळे होते असा गैरसमज मनातून काढून टाकून ते दुसऱ्या दिवशी टाकून देऊ नये. अशा दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींमध्ये पाण्याचा अकारण होणारा अपव्यय टाळावा, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले आहे.

मोरबे धरणामुळे नवी मुंबई शहर जलसमृध्द आहे. मात्र, आसपासच्या इतर शहरातील जलस्थितीचा गांभीर्याने विचार करुन सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वांनी कटीबध्द रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी