सफाईमित्रांसाठी विशेष कार्यशाळा

कार्यशाळेत पुण्यातील डॉ. स्मिता सिंह यांचे मार्गदशन

नवी मुंबई: स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई आघाडीवर असणारे शहर असून यामध्ये मलनिःस्सारण वाहिन्यांची सफाई  करणाऱ्या सफाईमित्रांचेही फार मोठे योगदान आहे. सफाईमित्रांना आपल्या कामाचे अद्ययावत ज्ञान असावे यादृष्टीने ‘नवी मुंबई महापालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'च्या वतीने सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'चे उपायुक्त तथा ‘स्व्च्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेंब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड तसेच प्रशिक्षण देणाऱ्या कॅम्प फाऊंडेशन पुणे या संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता सिंह, आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना शहर अभियंता संजय देसाई यांनी आपण करीत असलेल्या कामामध्ये परिपूर्ण होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेणेही स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबियांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असल्याचे सांगत त्यादृष्टीने या विशेष कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा काळजीपूर्वक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आता मॅनहोल पासून सुटका होऊन मशीनहोलचा वापर सुरु झाला असून केंद्र सरकारने २०२१ मध्ये सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज जाहीर करण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून म्हणजे सन २००८ पासून महापालिकेने यांत्रिकी साफसफाईला प्रारंभ केला असल्याचे सांगितले. मॅनहोल टाळून मशीनहोल द्वारे स्वच्छतेमुळे कामात अधिक गतीमानता आणि सुरक्षितता आली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षण माहिती आणि ज्ञानात अधिक भर घालणारे असून त्याचा जास्तीत जास्त् उपयोग करुन घ्यावा, असेही राजळे म्हणाले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत पुण्यातील कॅम्प फाउंडेशनच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता सिंह या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदशन करीत आहेत. यामध्ये सफाईमित्रांसाठी सुरक्षा साधने आणि साधन सामुग्री वापरणे, सक्शन जेटींग तसेच इतर मलनिःस्सारण साफसफाई विषयक वाहने आणि सुरक्षा साधने याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद सादला जाणार असून या कामाबाबत त्यांचेही मत जाणून घेतले जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर थकबाकीदारांसमोर ढोल वाजवा मोहीम