नवघर ग्रामस्थांचे रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलन
न्हावा-शेवा नव्हे नवघर रेल्वे स्टेशन नाव द्या!
नवी मुंबई ः मौजे नवघर येथील रेल्वे स्थानकाला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव न दिल्यास साहित्यिक तथा रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांनी रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. मागील १२ वर्षांपासून सिडको आणि रेल्वे प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार आणि चर्चा करुन देखील मौजे नवघर असताना नवघर रेल्वे स्टेशन नाव न
दिल्याने संतप्त नवघरवासियांनी प्रा. एल. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनवर मोर्चा नेऊन सिडको आणि रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात पुरुषांसह महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती.
आता लवकरच नेरुळ-उरण लोकलसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे केलेल्या मागणीनुसार नवघर रेल्वे स्टेशन नाव न दिल्यास रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील यांनी स्टेशनवर रेल्वे समोर आत्महत्या करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा सिडको प्रशासनाला यावेळी जाहीर सभेतून दिला. याप्रसंगी कामगार नेते भूषण पाटील, नवघरच्या सरपंच सविता मढवी, उपसरपंच दिपक बंडा, विजय भोईर, गंधार पाटील, विश्वास तांडेल, समाधान तांडेल, मोहन भोईर, रंजना भोईर, अविनाश म्हात्रे, रत्नाकर पाटील, उषा बंडा यांनीही आपले
विचार मांडून प्रशासनावर टीका केली.
यावेळी रवी वाजेकर वाजेकर, महादेव बंडा वाजेकर, योगेश तांडेल, भूमीत भगत, अजय पाटील, सुरेश भोईर, एम.डी.भोईर, कुंदन बंडा, कृष्णा ठाकूर, रवी भोईर, आशा पाटील, गणेश भोईर, ज्ञानेश्वर तांडेल, आदि उपस्थिती होते. सदर मोर्चासमयी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर मोर्चावेळी सभेचे सूत्रसंचालन गंधार पाटील यांनी केले.