नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5000 घरांना माेठा दिलासा

ग्रामस्थांच्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्याबाबत महापालिकेला निर्देश

नवी मुंबई : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5000 घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून  नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.    

याबाबतचे पत्र नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिका आयुक्त यांना पाठवले आहे.

यावेळी आ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील 29 गावातल्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना नवी मुंबई महानगरपालिकेने तीन पट टॅक्स लावला होता तर रकमेवर 18% व्याज आकारला जात होता.  नवी मुंबईतील अशा 5000 घरांना पालिकेमार्फत नोटीसा पाठवल्या गेल्या. आपल्या देशात समान कायदा आहे, असे असताना महापालिका क्षेत्रातील इतर घरांना वेगळा कर व ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वेगळा कर हा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर अन्याय आहे. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी नवी मुंबई शहर वसविताना आपल्या 100% जमिनी दिल्या आहेत. त्यांच्याच स्वतःच्या मालकी जमिनीवर बांधलेल्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्याची तसेच त्यावर लावण्यात आलेला 18% व्याज व दंड माफ करण्याची आवश्यकता होती. 

त्यावेळी नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा,यासाठी राज्याचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मागणी केली होती. सदरबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता तीन पट लावण्यात आलेला मालमत्ता कर रद्द करण्याबाबत नगरविकास विभागाकडून नवी मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत आयोजित ‘सायवलोथॉन'ला अडीचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्साही प्रतिसाद