शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक - प्रा. वृषाली मगदूम
नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने महिला दिनानिमित्त जनजागृती फेरी
वाशी - देशभरात महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्यामुळे महिलांची स्थिती सुधारत आहे, की बिघडली आहे हे लक्षात येते, असे मत स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त प्रा. वृषाली मगदूम यांनी वाशी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने महिला दिनानिमित्त वाशी रेल्वे स्थानक ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली होती. या फेरीच्या सांगता वेळी त्या बोलत होत्या.
प्रा. वृषाली मगदूम पुढे म्हणाल्या की, सरकारने आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचा शासन आदेश काढला आहे. हा आदेश समाजात फूट पाडणारा असल्याने तो मागे घेतला जावा. आपण मानवी मूल्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत; मात्र सध्या संविधानाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आपला आवाज सरकारपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
या वेळी सरकारकडे पुढील मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक गोष्टी उपलब्ध केल्या आहेत; परंतु त्यातील तरतुदींची पूर्तता नाही. उदा. प्रोटेक्शन ऑफिसर, निर्भया निधी शासनाकडून वापरला न जाणे, निधी वेळेवर उपलब्ध न होणे, आधार केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा नसणे इत्यादी.
तसेच अल्पवयीन मुलींवर होणा-या बलात्काराची प्रकरणे घडल्यावर मुलींच्या पोषाखावरून घरी येण्याच्या वेळेवरून, आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांवरून समाजातील काही उत्तरदायी व्यक्ती मुलीनांच उत्तरदायी मानतात. याचा परिणाम मुलींवरची स्त्रियांवरची बंधने वाढण्यात होतो.
महिलांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे अंकुश ठेवणा-या प्रवृत्तीचा या फेरीत निषेध व्यक्त करण्यात आला.
या फेरीत स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, अलर्ट इंडिया, विश्व बालक केंद्र, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, परिसर सखी विकास संस्था, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, अन्दय व्यसनमुक्ती केंद्र, घर हक्क संघर्ष समिती, समता महिला मंडळ, चेतना फाउंडेशन, वी नीड यू म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कल, श्रमिक जनता संघ, रिसोर्स अॅन्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, लाईफ अत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, लोकसेवा शिक्षण संस्था, अ. भा. जनवादी महिला संघटनांच्या प्रतिनिधी सहभागी होत्या.