नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यामध्ये महिला अभियंत्याचे मोलाचे योगदान

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली

नवी मुंबई : वेगवेगळ्या युक्त्या करून वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. मागील एप्रिल -२०२२ ते जानेवारी- २०२३ पर्यंत नेरुळ विभागामध्ये कलम१३५ अंतर्गत वीजचोरीची एकुण ३०५ प्रकरणे व कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराची एकुण ९० अशी एकुण ३९५ प्रकरणे उघडकीस आली आहेत. दोन्ही प्रकारच्या वीज चोरी प्रकरणांमधून महावितरणने एकुण २.३१ कोटी रुपयांची वसुली केलेली आहे व १९ वीज चोराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. नेरुळ विभागातील ९ महिला अभियंत्यांचा या मोहिमेमध्ये सहभाग असून या यशामध्ये महिला अभियंत्याचा मोलाचा वाटा आहे. 

वीजचोरीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेगा वीजचोरी पकड मोहीम राबविण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यअभियंता धनंजय औढेंकर यांनी दिलेल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आखण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमांना नेरुळ विभागात चांगले यश प्राप्त झाले आहे. सध्याचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सुद्धा वीजचोरी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता सिंहांजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ विभागामध्ये वीजचोरी मोहीम  नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जात आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी अंबाद, नानोटे, काळे व सर्व अभियंते जनमित्र, लाईनस्टाफ व सुरक्षा रक्षक यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे नेरुळ विभागामध्ये असलेल्या ९ महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असतात. 

या महिला अभियांत्याकडून मागील एप्रिल -२०२२ ते जानेवारी- २०२३ पर्यंत नेरुळ विभागामध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जानेवारी अखेरपर्यंत तब्बल १३००० ग्राहकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कलम१३५ अंतर्गत वीजचोरीची एकुण ३०५ प्रकरणे व कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराची एकुण ९० अशी एकुण ३९५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. तसेच या दोन्ही प्रकारच्या वीज चोरी प्रकरणांमधून महावितरणने एकुण २.३१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच १९ वीज चोराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

वीजचोरी विरुद्ध केलेल्या कारवाई मध्ये मिळालेल्या यशासाठी नेरुळ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील काकडे, व वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता माने यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व ग्राहकांनी अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे वीज वापर करावा व विजबिल वेळेत भरावे', असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान