विवेकानंद संकुल शाळेत साहित्यिक गुणांना वाव देणारा कार्यक्रम
विद्यार्थी-पालकांनी सादर केल्या स्वरचित कविता
नवी मुंबई : मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल शाळेमध्ये प्रथमच शाळेतील पालक यांच्या साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम २७ फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वरचित कविता त्याचप्रमाणे पालकांनी केलेल्या स्वरचित कविता यांचे सादरीकरण करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या. पालकांनीही स्वरचित तसेच बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज यांच्या कविता सादर केल्या. शाळेच्या या नूतन उपक्रमासाठी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. भाषा उपक्रमांचे पालकांसाठी आयोजन करावे असे शाळेला सुचवले. कार्यक्रमासाठी सुलेखनकार विलास समेळ, कवी शंकर गोपाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विलास समेळ यांच्या अक्षर लेखनाचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मित्र या कवितेचे गायन शाळेतील सहाय्यक शिक्षक गजानन साठे सर यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. रेश्मा देशपांडे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.