फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध पुस्तके वाचकांना वाचावयास मिळणार

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

ठाणे ः ज्ञानाचा साठा आत्मसात करण्याची कुवत मराठी भाषेमध्ये आहे. या भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय मधील समिती सभागृहामध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक तथा कवी रघुनाथ बापू देशमुख यांच्यासह ठाणे उप जिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपिनाथ ठोंबरे, तहसिलदार (सर्वसाधारण) राजाराम तवटे, नायब तहसीलदार स्मितल यादव यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सर्व शासकीय कामकाज मराठीमधून करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. कोणतेही ज्ञान आपल्या मायबोली भाषेतून समजून घेतले तर त्याचे आकलन लवकर होते. मराठी ग्रंथ संपदा एवढी मोठी आहे की, आपण ती शिकत मोठे  झालो आहोत. आपण सर्वजण मराठी भाषा जागणारे आणि सवर्धन करणारे आहोत, असे नमूद करुन ‘आपले दैनंदिन कामकाज मराठी भाषेतून करावे', असे आवाहन यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

आपली मराठी भाषा आपलेपणाने जपली पाहिजे. आपल्या मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी भाषा ज्ञान भाषा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. भाषा म्हणजे मानवाचा विकसनाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे भाषा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. मराठी अतिशय समृध्द भाषा आहे. मराठी भाषेला संतांची, वैभवशाली परंपरा आहे, असे यावेळी रघुनाथ देशमुख म्हणाले.

मराठी ग्रंथ संग्रहालय द्वारे सुरु करण्यात आलेल्या फिरते ग्रंथालयाची पाहणी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी केली. या फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध पुस्तके वाचकांना वाचावयास मिळत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात आजही राजरोस प्लास्टिक विक्री सुरुच