रतन टाटा यांना ‘महाराष्ट्र'चा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

 

टाटा यांना पुरस्कार देण्याने पुरस्काराचा वाढला सन्मान -मुख्यमंत्री

मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समुहाचे रतन टाटा यांना सदर पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

१९ ऑगस्ट रोजी पद्मविभूषण रतन टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ‘टाटा सन्स'चे चेअरमन तथा ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद'चे अध्यक्ष एन.
चंद्रशेखरन, ‘एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, आदि उपस्थित होते.

मिठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समुहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वासाचे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी रतन टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी टाटा यांच्यासमवेत चंद्रशेखरन आदिंशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजकपद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार ‘सिरम इन्स्टिट्युट'चे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार ‘किर्लोस्कर समुह'च्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘उद्योगमित्र' पुरस्काराचे स्वरुप १५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणिमानपत्र, ‘उद्योगिनी' पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

सदर पुरस्कार आज २० ऑगस्ट रोजी समारंभपूर्वक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. सदर समारंभ दुपारी २ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मधील जास्मिन हॉलमध्ये होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी ६ कोटी ६० लाख रुपयाचा निधी मंजूर