पावसाळी परिस्थिती, तत्पर मदत कार्यवाहीवर आयुवतांचा विशेष वॉच

पावसाळ्यात नागरिकांना त्रास न होता वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महापालिका दक्ष

नवी मुंबई : १७ जुलैपासून मोठया प्रमाणात सुरु झालेल्या पावसाने जराही उसंत घेतली नसून २८ जुलैपर्यंत मागील १२ दिवसात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल ८१४.९९ मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष असून संपूर्ण आपत्ती निवारण यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा व्हॉटस्‌ॲप समुह तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक समूह यावर नियमित संपर्कात राहून आयुक्त स्वतः आढावा घेत आहेत. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे निराकरण होऊन काम झाल्यानंतरची छायाचित्रे प्राप्त होईपर्यंत आढावा घेतला जात असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क राहून क्षेत्रीय स्थानांवर दक्षतेने काम करीत आहे.

नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने मोठ्या भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचते. अशी १४ ठिकाणे महापालिकेमार्फत निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील ५०५ कि.मी. पैकी १०८ कि.मी. रस्त्यांचे तर एमआयडीसी क्षेत्रातील १३६ कि.मी. पैकी १५ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण महापालिकेने केले आहे. याशिवाय शहरातील खड्डे पडत असलेल्या ८८ मुख्य चौकांमध्ये काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी ६३ चौकांचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलीस विभागाच्या परवानगीनंतर उर्वरित १० चौकांची कामे सुरु करण्यात येणार असून १३ चौकांची कामे पावसाळ्यामुळे सद्यस्थितीत थांबवण्यात आली आहेत. ‘एमआयडीसी'मार्फत १५ कि.मी. रस्त्यांचे काम सुरु असून त्याठिकाणी गटाराची व्यवस्था नसल्याने काम सुरु असलेल्या काही भागात पाणी साचत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेथील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत ठाणे बेलापूर मार्ग, आम्र मार्ग, पामबीच मार्ग या मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे दिसून येत असून ते दुरुस्त करण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील महत्वाची दुरुस्ती कामे महापालिकेमार्फत पावसाळापूर्व कालावधीत करण्यात येणार होती. मात्र, मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंब्रा बायपास आणि ठाणे कोपरी उड्डाणपुलाच्या कामामुळे या अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे या मार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक, प्रतिदिन सव्वा ते दीड लाख अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर अहोरात्र सुरु राहून या रस्त्यावर अतिरिक्त ताण आला. या वाहतुकीचा परिणाम आम्र मार्ग आणि पामबीच मार्गांवरही झाला आहे. तरीही हद्दीतील सर्वच रस्ते रहदारीसाठी सुस्थितीत रहावेत याकरिता महापालिका दक्ष आहे. यामध्ये छोट्या स्वरुपाचे खड्डे असल्यास ते कोल्डमिक्सने भरले जात असून काहीसे मोठ्या आकाराचे खड्डे असल्यास जिथे कोल्डमिक्स अथवा कॉन्क्रिटचा वापर करता येत नाही तेथे पेव्हर ब्लॉकचा वापर करुन रस्ते दुरुस्ती केली जात आहे. पामबीच मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील पूल अशा दोन ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पध्दतीचा वापर करण्यात आला आहे, असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्ग ‘पीडब्ल्यूडी'च्या अखत्यारित आहे. फवत त्यावरील ४ उड्डाणपूल ‘एमएसआरडीसी'मार्फत नवी मुंबई महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. त्या अनुषंगाने त्याची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव महापालिकेने एप्रिल मध्येच मंजूर केले होते. मात्र, सदर जागा ‘पीडब्ल्यूडी'ची असल्याची हरकत नोंदविण्यात आल्याने या उड्डाणपुलांची कामे स्थगित करणे महापालिकेस भाग पडले. तरीही वाहतूक पोलिसांच्या विनंतीनुसार महापालिका तेथील रहदारी सुरळीत रहावी याकरिता तेथील खड्डे दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांना मदत करीत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे व तालुक्यातील आठ उप केंद्रांकडे शासनाचे दुर्लक्ष ?