बाजार समिती संचालक मंडळाची बैठक पणन संचालकांकडून रद्द

पणन संचालकांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल -माजी सभापती


वाशी : वाशी येथील ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या (एपीएमसी) संचालक मंडळाची बैठक ३० जून रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्याच्या  पणन संचालकांनी  सभा रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे ‘बाजार समिती'तील  डिसेंबर २०२२ पासून रखडलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांना पुन्हा एकदा खो बसला आहे.

‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती'तील ७ सदस्यांना पणन संचालकांनी अपात्र ठरवले होते. मात्र, न्यायालयाने या आदेशाला  स्थगिती दिल्याने संचालक मंडळ सभेसाठी आवश्यक सदस्यांची गणपूर्ती पूर्ण होत आहे. त्यामुळे ३० जून रोजी ‘बाजार समिती'च्या संचालक मंडळाची बैठक घेण्याचे परिपत्रक समिती सचिवांनी काढले होते. सदर परिपत्रकात प्रथमतः अत्यावश्यक कामांचे तसेच कर्मचारी भत्ता, सर्व्हिस रस्ता डांबरीकरण, कार्यालये, गाळे कॅन्टीन भाडेपट्टा करार, मालमत्ता विभाग, प्रशासन, तातडीचे येणारे विषय, आदि कामांच्या मंजुरीचे विषय पटलावर घेण्यात येणार होते. मात्र, संचालक मंडळातील सभापती आणि उप-सभापती यांनी डिसेंबर, २०२२ मध्ये राजीनामे दिलेले असून ते मंजूर करण्यात आले आहेत. तसेच सध्याच्या संचालक मंडळातील १० सदस्यांचे सदस्यत्व अपात्रता प्रकरणी न्यायालयात प्रकरणे दाखल असून सदर प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने ३०जून २०२३ रोजीची ‘बाजार समिती'ची संचालक मंडळ सभा रद्द करण्यात यावी, असे आदेश पणन संचालकांनी बाजार समिती प्रशासनास दिले होते. त्यामुळे ‘संचालक मंडळ'ची सभा रद्द करण्यात आली आहे. परिणामी, डिसेंबर २०२२ पासून ‘बाजार समिती'तील रखडलेल्या धोरणात्मक निर्णयांना पुन्हा एकदा खो बसला आहे.

‘बाजार समिती'तील संचालकांच्या अपात्रतेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे बैठकीसाठी लागणारी गणसंख्या पूर्ण होत आहे. तर नवीन सभापती निवड होईपर्यंत जुने सभापती काम पाहू शकतात, अशी तरतूद आहे. तरी देखील पणन संचालकांनी सभा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशाविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालय लवकरच सभा घेण्याचे आदेश देतील, अशी आम्हाला आशा आहे. - अशोक डक, माजी  सभापती, एपीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम'द्वारे नवनिर्मितीला संधी, शहर विकासाला गतीमानता