ऐन उन्हाळ्यात रहिवाशांचे पुरेशा पाण्याविना हाल

कोपरी गावात सायंकाळी ऐवजी दिवसभर पाणी बंद

वाशी : पावसाचा अंदाज आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई शहरात विभागवार सायंकाळी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तुर्भे विभागात रविवारी सायंकाळी पाणी बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, याच विभागात मोडणाऱ्या कोपरी गावात रविवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

यंदा पाऊस लांबणार असून, सरासरी पेक्षा पाऊस कमी पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पाणी वापराबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता मोरबे धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विभागवार आठवडयातून एक दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद करुन पाणी कपात करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २८ एप्रिल २०२३ पासून सात विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असून, तुर्भे विभागात रविवारी पाणी पुरवठा बंद असतो. मात्र, याच विभागात मोडणाऱ्या कोपरी गावात रविवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद असतो. तसेच इतर दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कोपरी गावात पुरेशा पाण्याविना हाल होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुवतांकडून नागरी सुविधांचा तपशीलवार आढावा