ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्याचे नागरिकांना पुन्हा आवाहन

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाची महापालिका आयुवतांकडून पाहणी

नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापनातील कचऱ्याची विल्हेवाट एक अत्यंत महत्वाचा घटक असून तुर्भे एमआयडीसी परिसरातील नवी मुंबई महापालिकेचा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प देशातील एक उत्तम प्रकल्प म्हणून नावाजला जातो. तरीही स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असून स्वच्छता प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करणे गरजेचे आहे, या भूमिकेतून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर शहर स्वच्छतेप्रमाणेच घनकचरा विल्हेवाटीकडेही बारकाईने लक्ष देत आहेत.

या अनुषंगाने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता  शिरीष आरदवाड आणि संबंधित अधिकाऱ्यांसह घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची पाहणी केली.

नागरिकांकडून कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर महापालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे. ते नागरिकांकडून अपेक्षित करताना नागरिकांकडून संकलित केलेला वर्गीकृत कचरा संकलन आणि वाहतूक करतेवेळी एकत्र होणार नाही याची दक्षता घ्ोण्याच्या सूचना आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

वर्गीकरण न करता येणारा कचरा प्रकल्पस्थळी आल्यावर वर्गीकरण करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्तरावर कचरा वर्गीकरण न केल्यामुळे प्रकल्पस्थळी आपल्या स्वच्छताकर्मींना तो वेगळा करावा लागतो. परिणामी, स्वच्छतामित्रांचे काम आपल्यामुळे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या घरातच कचरा टाकताना तो ओला आणि सुका अशा वेगवेगळया डब्यात टाकावा. स्वच्छताकर्मींना त्यांच्या कामातून काही प्रमाणात दिलासा द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी पुन्हा एकवार केले आहे.

प्रकल्पस्थळी काम करीत असलेल्या कामगारांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षाविषयक बाबींकडेही काटेकोर लक्ष देण्यात यावे. प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यावर २८ दिवसांमध्ये बायोकल्चर फवारुन विंड्रोज तयार केले जातात. त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया करुन सेंद्रिय खत तयार होते. सदर सेंद्रिय खत उद्यानांचे शहर अशी ओळख असणाऱ्या आपल्या नवी मुंबई मधील २०० हून अधिक उद्याने फुलविण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील आणि क्षेत्राबाहेरील व्यक्ती तसेच शेतकरी उद्यानांकरिता तसेच शेतीकरिता खत खरेदी करुन वापरतात. या खताची दैनंदिन निर्मिती आणि वापर याचा तुलनात्मक अभ्यास करुन या खताचा जास्तीत जास्त वापर होईल, याकडे लक्ष देण्यात यावे. प्रकल्पस्थळी प्लास्टिकवर प्रक्रिया केली जात असून प्लास्टिकपासून ग्रॅन्युल्स तयार केले जातात. व्यावसायिकांकडून पकडलेले प्रतिबंधात्मक प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्या प्रकल्पस्थळी आणल्या जाऊन त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णतः थांबवावा यासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

तुर्भे येथील प्रकल्पस्थळी ६० घ.मी. क्षमतेचा लिचेट प्रक्रिया प्रकल्प असून त्यामधे लिचेटवर प्रक्रिया केली जाते. येथील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रकल्पस्थळी येणाऱ्याा घनकचऱ्यावर डिओड्रन्ट स्प्रे केला जात असून नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्ोण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ईटीसी केंद्राद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन