रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
बाळकुम येथे आयुष्यमान भव अभियान संपन्न
महापालिका मार्फत डेंग्यू, मलेरिया आजारांबाबत जनजागृती
ठाणे : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आयुष्यमान भव अभियान अंतर्गत बाळकुम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाळकुम परिसरात डेंग्यू, मलेरिया या आजारांचे रुग्ण वाढत असून याबाबत दोस्ती बांधकाम परिसरात जनजागृती करण्यात आली. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणारे कामगार यांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची माहिती देण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितिल, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताली हुमरस्कर यांच्या सहकार्याने सदर मेळावा पार पडला. यावेळी बाळकुम परिसरात औषध आणि धूरफवारणी करण्यात आली. दोस्ती बांधकाम येथे काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आरोग्यतपासणी करण्यात आली. तसेच आजाराचे निदान करुन २०० जणांना औषधोपचार देण्यात आले. याशिवाय डेंग्यू, मलेरियाचे निवारण करण्यासंदर्भातील माहितीपत्रके देण्यात आली. तर १८३ जणांच्या मलेरिया, डेंग्यू याबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या. १८४ जणांची रक्तदाब, १८३ जणांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. ३४ जणांचे क्षयरोग एक्स-रे काढण्यात आले तर ५ जणांना धनुर्वाताची लस देण्यात आली. १० ठिकाणचे पाणी नमुने देखील यावेळी घेण्यात आले. तर मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, किडनी आजार आदि तपासणी, निदान, उपचार, संदर्भसेवांचे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी देखील या मेळाव्यादरम्यान करण्यात आली.
बाळकुम आरोग्य केंद्रातंर्गत घेण्यात आलेल्या सदर मेळाव्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी देवल यांच्यासह जीवनशास्त्रज्ञ, फायलेरिया, मलेरिया, आदि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.