आगामी ३० वर्षाचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेवून पाणीपुरवठा नियोजनासाठी महापालिका सज्ज

विविध धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा -आयुवत बांगर

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे २७ लक्ष लोकसंख्येसाठी सद्यस्थितीत ५८५ द.ल.लि. पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येतो. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० द.ल.लि., ‘एमआयडीसी'कडून १३५ द.ल.लि., स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा कंपनी कडून ११५ द.ल.लि., बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. आगामी ३० वर्षामध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेवून मुबलक आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून नियोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने विविध धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या अमृत २.० अंतर्गत पाणी वहन, वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकणे आणि जलकुंभ, संप पंप हाऊस बांधणे तसेच विद्युत पंप बसविणे आदि कामांसाठी मंजुरी प्राप्त असून सदरची कामे सुरु करण्यात येत आहेत. विविध संस्थांकडून पाणी उपलब्ध करुन घेत असताना नियमित देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घ्यावे लागतात. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन म्हणजेच पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने सक्रिय भूमिका घेवून पाणी आरक्षण ठेवणेबाबत नियोजन केले असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मीरा-भाईंदर महापालिकेला सूर्या धरणातून नजिकच्या काळात २१८ द.ल.लि. पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एमआयडीसी आणि स्टेम मार्फत त्यांना दिला जाणारा पाण्याचा कोटा ठाणे महापालिकासाठी अतिरिक्त होणार आहे. सदर अतिरिक्त उपलब्ध होणाऱ्या कोट्यामधून ‘एमआयडीसी'मार्फत ५० द.ल.लि. आणि स्टेमकडून ५० द.ल.लि. पाणी ठाणे महापालिकेस उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाला विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुवयातील देहरजी धरणामधून २०० द.ल.लि. आणि शहापूर येथील मुमरी धरणाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होणार असल्याने त्यामधुन १०० द.ल.लि. पाणी आरक्षित ठेवण्याबाबतची जलसंपदा विभागाला विनंती करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून ४०० द.ल.लि. प्रतीदिन एवढा पाणीसाठा ठाणे महापालिकेला मिळणे अत्यावश्यक असल्याने त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी एमएमआरडीए महानगर आयुक्त आणि प्रधान सचिव, जलसंपदा विभाग यांना पाठविण्यात आला आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्यांबाबत बैठक झाली होती. सदर बैठकीमध्ये बारवी धरणातून पाण्याचा कोटा महापालिकेला देण्यासाठी तसेच धरणाच्या वाढलेल्या उंचीच्या प्रमाणात सदरचा साठा १०० द.ल.लि. करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.त्याबाबत जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. सदर बैठकीत भातसा धरणातून ठाणे महापालिकेच्या योजनेद्वारे सध्या २५० द.ल.लि. पाणी उचलले जाते. त्यामध्ये ५० द.ल.लि.ची वाढ करुन अतिरिक्त कोटा मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर ५० द.ल.लि. चा कोटा उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाला विनंती करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेला सद्यस्थितीमध्ये ६१६ द.ल.लि. प्रतीदिन एवढा कोटा मंजूर आहे. २०५५ पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणतः १११६ द.ल.लि. प्रतीदिन एवढा पाणीपुरवठा अपेक्षित असून त्यानुसार महापालिकेला नियोजन करणे अपेक्षित आहे. भविष्य काळातील ठाणे शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात ठाणे महापालिका सक्रिय आहे. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्यावतीने गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी मोफत