शेमटीखार ग्रामस्थांचा लढा यशस्वी
रेल्वे प्रशासन, ठेकेदार नरमले; स्थानिकांमार्फतच रांजणपाडा रेल्वे नोकर भरती
उरण : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून सरपंचांमार्फत परस्पर नोकर भरती केल्याप्रकरणी धुतूम शेमटीखारच्या ग्रामस्थांनी एकजुटीने ९ ऑवटोबर रोजी बेमुदत उपोषण सुरु केले होते. यासंदर्भात ‘पनवेल संघर्ष समिती'च्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांची रेल्वे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात चर्चा होऊन तिढा सोडविण्यात आला. त्यामुळे ठेकेदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या साक्षीने नोकर भरती स्थानिकांमार्फत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर १० ऑवटोबर रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले. ‘मध्य रेल्वे'च्या रांजणपाडा रेल्वे स्टेशन वरील प्रायोगिक तत्वाच्या कामासाठी कंत्राटी पध्दतीने सात कामगारांची वर्णी लावण्यात आली. त्यामध्ये शेतकरी, काही सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी सदस्यांच्या मर्जीतील कामगारांचा समावेश झाल्याने शेतकरी संतप्त होऊन आंदोलनाची ठिणगी पडली. १० ऑवटोबर रोजी दुसऱ्या दिवशी तीन आंदोलकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने तातडीने सरकारी वैद्यकीय अधिकारी उपोषणस्थळी येऊन प्राथमिक उपचार केले.
दुसरीकडे ठरल्याप्रमाणे १० ऑवटोबर रोजी सकाळी ‘रेल्वे'च्या अधिकारी शुभांगी मॅडम, दक्षता विभागाचे सोनावणे यांनी ‘रेल्वे'च्या दालनात सरपंच, ग्रामपंचायत कमिटी आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. सदर बैठकीत आंदोलकांच्या तिन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर आंदोलक आंदोलनास्थळी आले. यावेळी लेखी आश्वासन मागितल्यानंतर बैठकीतील चर्चेला छेद देत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरविला. शिवाय सरपंचांना आंदोलनाच्या मागण्या मान्य नसल्याने आपण काहीही करु शकत नाही, असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्यांनी सपशेल हात वर केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी कायद्याचा आधार घेत रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आंदोलनाची दखल न घेणाऱ्या तहसीलदार उध्दव कदम यांना करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराही यावेळी दिला. सरपंच पद मालकी तत्व नसून लोकसेवक असल्याची आठवण करुन देत रेल्वे प्रशासनावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने दोन तासांच्या संघर्षानंतर रेल्वे अधिकारी आणि ठेकेदारांनी नांगी टाकली. अखेर शेमटीखार आंदोलकांना नोकर भरतीचे लेखी आश्वासन देण्यात आले.
राजेश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि ‘शेमटीखार संघटना'चे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी ‘आयओटी'च्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढा देण्याची घोषणा केली.
चर्चेत आंदोलनकर्त्यांसह ‘राजिप'च्या माजी सदस्या कुंदा ठाकूर, शरद ठाकूर, नितीन मढवी, ‘संघर्ष समिती'चे सचिन पाटील, वैभव जोशी, हरेश पाटील तर ‘रेल्वे'च्या शुभांगी मॅडम यांच्या समवेत दक्षता विभागाचे सोनावणे, ठेकेदार महेश म्हात्रे, उरण पोलीस ठाण्याचे पथक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आदि उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांमध्ये विनोद ठाकूर, रेश्मा ठाकूर, रणजीत ठाकूर, विनोद घरत, सुंदर ठाकूर, रोशन ठाकूर, राम पाटील, मेघनाथ ठाकूर, किशोर पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, लीलाधर घरत, मनोहर ठाकूर, अनंत ठाकूर, गणेश पाटील, मेघनाथ ठाकूर, जयेश घरत, आदिंचा समावेश होता.
सिडको अधिकारी अडचणीत?
रांजणपाडा रेल्वे स्टेशनशी ‘सिडको'चा दुरान्वये संबंध नसल्याची हाकाटी पिटत आंदोलनकर्त्यांना टाळणारे सिडको अधिकारी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर तोंडावर आपटले आहेत. ‘सिडको'चे रेल्वे विभागातील अधीक्षक अभियंता सिताराम रोकडे यांनी ‘सिडको'चा रांजणपाडा रेल्वे स्टेशनची संबंध नसल्याचे सांगितले होते. याविषयी शुभांगी मॅडम यांना छेडले असता, ‘सिडको'ने जमीन संपादन करुन रेल्वेला हस्तांतरीत केली आहे. शिवाय लेखी करार केला असून त्यांना जबाबदारी झटकता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सिडको अधिकारी अडचणीत आले आहेत.