कौपिनेश्वर मंदिराची महापालिका आयुवत, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

मंदिराचा जीर्णोध्दार करताना चर्चा करुनच निर्णय -आयुवत बांगर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा श्री कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या ‘जीर्णोध्दार'ची प्रक्रिया मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण (एदग्त् ूोूग्हु) यांच्या माध्यमातून केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत नमूद केले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे ४.३ फुट उंचीचे आणि १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आणि ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले श्री कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ.स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. १८७९ मध्ये वर्गणी गोळा करुन मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६मध्ये येथील सभामंडपाचाही जीर्णोध्दार करण्यात आला. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे सदर परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घ्ोऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार, मंदिर परिसराचे सुशोभिकरणाचा संकल्प केला असून त्यांनी याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शिनगारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तासमवेत बैठक पार पडली.

भाजी मंडई आणि सदर परिसरात असणारे मंदिराचे प्रवेशद्वार परिसर सुशोभित करण्यासाठीही योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सुशोभिकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरुण कलमदानी यांनी मंदिर तसेच या परिसरात होणारे उपक्रम, येणारे भक्त आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन एक आराखडा तयार केला आहे. तो आराखडा महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पहावा, अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. ती विनंती मान्य करुन सदर आराखडा पाहून आणि वास्तुरचनाकारांशी चर्चा करु, असेे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

मंदिराचे स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर सदर वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार करावा, ते स्पष्ट होईल. तसेच माती परिक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलीवर आहे, ते कळेल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील. तसेच जर मंदिराचा पूर्ण जिर्णोध्दार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू आणि त्याकाळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करुनच बांधकाम करावे लागेल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्थिती दर्शक माहिती देऊ. त्या पुढील कार्यवाही त्यांच्या निर्देशाप्रमाणे घेऊन करु, असे आयुवत बांगर यांनी सांगितले.

सदर बैठकीस ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी तसेच श्री कौपीनेश्वर मंदिराचे विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे, आदि उपस्थित होते.

भाजी मंडई साफसफाईचे निर्देश...
मंदिराच्या बाजुला भाजी मंडई असल्याने या ठिकाणी दिवसभर भाज्यांची आवक सुरु असते. तसेच भाजी मंडईतील खराब झालेला भाजीपाल्याचा उग्र वास मंदिर परिसरात येत असल्याची बाब विश्वस्तांनी आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागला या परिसराची साफसफाई नियमित आणि दिवसांतून दोन ते तीन वेळा होईल या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. तसेच मुख्य मंदिराचे डिझाईन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. - अभिजीत बांगर, आयुक्त-ठाणे महापालिका.

श्री कौपीनेश्वर मंदिर ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यामुळे मंदिराचा जीर्णोध्दार करण्याबरोबरच आजुबाजुचा परिसर, मंदिराची वास्तू, दशक्रिया विधी परिसर याबाबत नियोजन करताना मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही केली जाईल. - अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी-ठाणे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेचा कचरा आदई-नेवाळीच्या जागेत