जिल्हाधिकाऱ्यांची सीईओंसह प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री भेट

राज्य शासनाचे आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य

ठाणे : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करुन सद्यःस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी ५ ऑवटोबर रोजी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या होत्या.

या बैठकीनंतर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास ५ आवटोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांच्यासह नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री १० वाजता एका महिलेची प्रसुती झाली होती.

  जिल्हाधिकारी शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का? याची माहिती घ्ोतली. तसेच या आरोग्य केंद्रातील प्रसुती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

यानंतर रात्री दीड वाजता जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? पुरेशी औषधे आहेत का? याची चौकशी करुन खातरजमाही केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली.

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार आणि औषधे तातडीने उपलब्ध करुन देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केल्या. तसेच आरोग्य केंद्रात पुरेसा पाणी आणि वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतुकीच्या नियमांना बगल