‘स्वच्छांजली'द्वारे स्वच्छताकर्मींविषयी कृतज्ञता

कामगारांचा सन्मान करण्याची नवी मुंबई महापालिकेची परंपरा -सुलेखनकार अच्युत पालव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्पिथिएटर येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘स्वच्छांजली' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे आयकॉन तथा जगप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव, तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारप्राप्त आंतराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी उपस्थित होते. तर अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभाग उपायुक्त मंगला माळवे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, विजय राऊत, सुनिल लाड, प्रवीण गाढे, शुभांगी दोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, उपअभियंता वसंत पडघन, संतोष मोरजकर आणि इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

रोज सकाळी न चुकता शहराच्या स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या स्वच्छतामित्रांबद्दल माझ्यासह सर्व नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘स्वच्छांजली'ला आनंदाने उपस्थित राहिलो आहे. स्वच्छताकर्मींच्या सन्मानाची संस्कृती नवी मुंबई महापालिका जपत असल्याबद्दल सुलेखनकार अच्युत पालव यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ‘स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत १५ सप्टेंबर पासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत आपण स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविलेले असून १ लाख ८३ हजारहुन अधिक विद्यार्थी सहभागाने यशस्वी झालेली स्वच्छ चित्रकला स्पर्धा, २६ हजारहून अधिक नागरिकांनी घेतलेली स्वच्छतेची डिजीटल शपथ तसेच शहरात आठ विभागांमध्ये १ लाख १४ हजारहुन अधिक नागरिकांनी एकाचवेळी घेतलेली सामुहिक स्वच्छता शपथ आणि खारफुटी स्वच्छता मोहीम अशा ३ भव्यतम आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'मध्ये झालेली आहे. सदरचे यश नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छताविषयक जागरुकतेचे आणि एकजुटीचे यश आहे. एकंदरीतच स्वच्छता ‘नवी मुंबई'चा ब्रँड होण्यामागे तसेच नवी मुंबईच्या आजवरच्या सातत्यपूर्ण नावलौकिकात स्वच्छताकर्मी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्याप्रमाणेच स्वच्छतेविषयी जागरुक नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे अशा सर्वच घटकांच्या नेहमीच मिळणाऱ्या अनमोल योगदानाबद्दल अतिरिवत आयुवत सुजाता ढोले यांनी आभार मानले.

तसेच स्वच्छता निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण मिळून व्यापक लोकसहभागातून आणखी नाविन्यपूर्ण काम करु, असा विश्वास सुजाता ढोले यांनी व्यक्त केला.

प्रत्येक कार्यक्रमात श्रमप्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने स्वच्छतेप्रमाणेच इतर सेवा पुरविणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्याची नवी मुंबई महापालिकेची परंपरा आहे. त्यानुसार यावेळी पाणी पुरवठा आणि मोरबे धरण प्रकल्पावर काम करणाऱ्या १५ पुरुष-महिला कामगारांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

घणसोली विभागातील सफाई कर्मचारी धनंजय कांबळे यांनी सादर केलेल्या ‘मेरे देश की धरती' या गीत गायनाने सुरेल प्रारंभ झालेल्या सदर ‘स्वच्छांजली'मध्ये पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘कचरा नव्हे संपत्ती' अशी नाटिका तसेच महापालिका माध्यमिक शाळा क्र.१११ तुर्भे स्टोअरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले समुहनृत्य ‘माटी पुकारे तुझे देश पुकारे' उपस्थितांची दाद मिळवून गेले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष ; महापालिका कामगारांचे ‘आमरण उपोषण' आंदोलन