दिवाळीपूर्वी ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करण्याची मागणी

अन्यथा एमआयएम ‘नवी मुंबई मेट्रो'चे प्रतिकात्मक उद्‌घाटन करणार

नवी मुंबई : दिवाळीपूर्वी ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करा; अन्यथा एमआयएम या सेवेचे प्रतिकात्मक उद्‌घाटन करणार, असा इशारा ‘एमआयएम विद्यार्थी आघाडी'चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा नवी मुंबई-रायगड प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून दिला आहे.

मुंबई-गोवा मार्गाप्रमाणेच नवी मुंबई मेट्रो सेवा लांबणीवर पडत चालली आहे. बेलापूर ते पेंधर अशा जवळपास ११ कि.मी.दरम्यान असलेल्या ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम २०१३ मध्ये सुरु झालेले आहे. ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम सुरु झाल्यानंतर खारघर, तळोजा, पेंधर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. या परिसरात मोठ्या संख्येने गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. हजाराेंच्या संख्येने मुंबई, ठाणे येथून रहिवाशी या ठिकाणी सदनिका घेवून  वास्तव्यासही आले. आज तळोजा फेज-१ आणि २ ची लोकसंख्या एक लाखाहुनही अधिक आहे. खारघरची लोकसंख्या जवळपास ५० हजाराच्या घरात आहे. पेंधरचीही लोकसंख्या वाढत चालली आहे. ‘मेट्रो'ची सुविधा मिळणार म्हणून नागरीकरण वेगाने झाले. परंतु, एक दशक उलटूनही मेट्रो सुरु न झाल्याने या परिसरातील आता दुसऱ्या उपनगराकडे वाट धरली असल्याचे शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘नवी मुंबई मेट्रो'चे बेलापूर ते पेंधर तळोजा दरम्यानचे काम चार-सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. दीड महिन्यापूर्वीच ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम पूर्ण झाल्याचे ‘महामेट्रो'ने ‘सिडको'ला लेखी स्वरुपात कळविले आहे. आजमितीस तळोजा, पेंधर, खारघर, बेलापूर दरम्यान मेट्रो सुरु न झाल्याने तसेच ‘एनएमएमटी'च्या बसेस संख्येने कमी असल्याने रहिवाशांना प्रवासासाठी दररोज खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी २५० ते ३०० रुपये एकावेळेस मोजावे लागत आहेत. यामुळे लोकांच्या खिशाला आर्थिक फटकाही बसत असून शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे. वेळ आणि पैसा जात असल्याने तसेच पुरेशी प्रवासी सुविधा नसल्याने लोक वास्तव्यासाठी पुन्हा नवी मुंबई, ठाणे, पनवेलला पसंती देवू लागले आहेत. सदरचे चित्र शोभनीय नाही. त्यामुळे आता ‘नवी मुंबई मेट्रो'चे सरकारने लवकरात लवकर लोर्कापण करणे आवश्यक आहे, असे शाहनवाझ खान यांनी सदर निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे राज्य सरकारने १४ नोव्हेंबर दिवाळी पाडवापूर्वी ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन न केल्यास ‘एमआयमएम'च्या वतीने ‘नवी मुंबई मेट्रो'चे प्रतिकात्मक स्वरुपात लोकार्पण करु, असे शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदर निवेदनातू सूचित केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘स्वच्छांजली'द्वारे स्वच्छताकर्मींविषयी कृतज्ञता