ज्येष्ठ नागरिकांच्या कला-क्रीडा गुणांच्या कौतुकाने सजला ज्येष्ठ नागरिक दिन

ज्येष्ठांच्या सेवा-सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई पहिली महापालिका -आयुवत नार्वेकर


नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक आधार असणारी विरंगुळा केंद्रे, सवलतीत एनएमएमटी बस सुविधा, आरोग्य सेवा अशा विविध बाबीनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी नवी मुंबई महापालिका प्रत्येक वर्षी ज्येष्ठांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम राबवित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असते. अशाच प्रकारे या वर्षीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन वाशी मधील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जल्लोषात साजरा झाला.

याप्रसंगी आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत जवादे, माजी नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, जी. एस. पाटील, ‘अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटना'चे उपाध्यक्ष तथा ‘नवी मुंबई महापालिका ज्येष्ठ नागरिक कक्ष'चे सदस्य अण्णासाहेब टेकाळे, ‘फेसकॉम'चे सचिव सुरेश पोटे यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे चालविणाऱ्या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.

भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नवी मुंबईत सुरु झाले आणि नंतर भारतातील इतर शहरांनी त्याचे अनुकरण केले याचा अभिमान व्यक्त करीत आमदार गणेश नाईक यांनी त्याच धर्तीवर प्रत्येक नोडमध्ये ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे असावीत, अशी सूचना केली.

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई ज्येष्ठांना चांगल्या सुविधा पुरवित त्यांचा सन्मान करणारी महापालिका असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे ज्येष्ठांच्या सेवेसाठी लवकरात लवकर कार्यान्वित करावे, असे सूचित केले.

ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई पहिली महापालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत मोठ्या संख्येने असलेली शहरातील २९ विरंगुळा केंद्रे समवयस्क ज्येष्ठ मित्रांना आपल्या मनातले सांगण्याची आपुलकीची ठिकाणे झाली असल्याचे मत आयुवत राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठांना अनेक उपयोगी सुविधा उपलब्ध करुन देताना ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र लवकरच सुरु होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्या मुलांना चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागल्याने आपल्या वृध्द आई-वडीलांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न पडतो, अशी मुले तात्पुरत्या कालावधीसाठी आई-वडीलांना या केंद्रात ठेवू शक्तात, अशी माहिती आयुक्त नार्वेकर यांनी दिली.
‘ज्येष्ठ नागरिक दिन'चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री अभिनय, वेशभूषा, काव्यवाचन, गायन, नृत्य, कथाकथन, हास्य, टेलिफोन, टपाल पत्रलेखन, निबंध, कॅरम, बुध्दिबळ, ब्रिझ अशा विविध कला-क्रीडा गुणदर्शन स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिेके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विवाहास ५० वर्ष पूर्ण झालेल्या १५ ज्येष्ठ दाम्पत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ७५ ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धांचे परीक्षण करणाऱ्या माधवी देशमुख, प्रतिक सातपुते, सिंधू नायर, रविंद्र पारकर, शुभांगी साळुंके, संजय गडकरी, पल्लवी बुलाखे यांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातील गीत-नृत्याचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांनी ‘ज्येष्ठ नागरिक दिन'चा विशेष कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
दरम्यान, ‘ज्येष्ठ नागरिक दिन'च्या नाट्यगृहातील कार्यक्रमापूर्वी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘स्वच्छता हीच सेवा' उपक्रमांतर्गत आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बालाजी मंदीर भूखंडाच्या सीआरझेड स्थितीची फेरतपासणी