श्रमदानासाठी हजारो ठाणेकर उतरले रस्त्यावर

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातही स्वच्छता

ठाणे : एक तारीख, एक तास, एक साथ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता ही सेवा-श्रमदान उपक्रमात हजारो ठाणेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला. सोसायटी, शाळा, आरोग्य केंद्र, ‘टीएमटी'चे डेपो यांच्या आवारापासून, रस्त्यांवरील अस्वच्छ भागापर्यंत आणि उड्डाणपुलांच्या खालील जागांपासून ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी नागरिकांनी श्रमदान केले.

महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी ‘स्वच्छता ही सेवा' असे अनोखे अभियान जाहीर केले होते. सदर अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची आठवडाभर तयारी सुरु होती. स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल असे काही करु नये या मध्यवर्ती सूत्राभोवती ठाण्यातील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्याने जसे काम करावे अशी आपली अपेक्षा असते तसे काम आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष करुया, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले होते.

सफाई कर्मचाऱ्यांविषयी वाढेल आदर -आयुक्त बांगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदानाचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात नागरिकांच्या साथीने लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्या सहभागी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर उपक्रम म्हणजे केवळ छायाचित्रासाठीचा उपक्रम न ठरता प्रत्यक्ष स्वच्छता झालेली दिसली पाहिजे, असे निर्देश दिले होते. सफाई  कर्मचारी कोणत्या स्थितीत काम करतात याची जाणीव या निमित्ताने अधिकाऱ्यांना होईल. त्यांना वेगळा अनुभव मिळेल. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांची सजगता वाढेल आणि नागरिकांना स्वच्छता कर्मचाऱ्यांविषयी आदर वाढेल. हेच या उपक्रमातून अभिप्रेत आहे, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.


स्वच्छता तिथेच आरोग्य नांदते -जिल्हाधिकारी शिनगारे
ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिकेसह सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ही सेवा उपक्रमात श्रमदानाचे आयोजन केले. त्यात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी श्रम करणे केवळ विशिष्ट लोकांचीच जबाबदारी नाही, त्यात सगळ्यांनीच सहभागी व्हायला हवे. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा आठवून त्याप्रमाणे कृती करण्यासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच आरोग्य नांदते. त्यामुळे एक दिवसासाठी नव्हे तर कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी आपण कृतीशील राहूया, असे प्रतिपादन ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

माजिवडा उड्डाणपुलाच्या खाली स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. माजिवडा उड्डाणपुलाच्या एका दिशेने सफाईची सुरुवात करून उड्डाणपूलाच्या अखेरपर्यंत सफाई मोहिम राबविण्यात आली. कचरा गोळा करून घंटागाडीत टाकण्यात आला. तर, माती, दगड, रॅबिट, आदिंचे ढीग तयार करण्यात आले. त्यात आमदार  संजय केळकर, माजी महापौर  नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी संजय भोईर, माजी नगरसेविका सौ. उषा भोईर, महापालिका आयुक्त बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, तुषार पवार, सौ. अनघा कदम, दिनेश तायडे, ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चे स्वयंसेवक, आदि सहभागी झाले.

 ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम...
        ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमदार संजय केळकर, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे यांच्यासह ‘संत निरंकारी मिशन'चे अनुयायी यांनी साफसफाई केली. प्लॅटफॉर्म क्रमांक-२च्या बाहेरील परिसराची, पादचारी पुलाची साफसफाई करण्यात आली. तसेच परिसरातील भिंतीवर चिकटविण्यात आलेली भित्तीपत्रके काढण्यात आली. त्याचबरोबर थुंकून खराब करण्यात आलेल्या भिंती पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आल्या. यामध्ये आयुवत अभिजीत बांगर यांनी स्वतःहुन पुढाकार घेतला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेपत्ता ज्येष्ठाची ज्येष्ठ नागरिक दिनी घडवली कुटुंबियांशी पुनर्भेट