‘श्रीे' विसर्जनासाठी महापालिका तर्फे नियोजन

महापालिका क्षेत्रातील सर्व १६३ विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था

नवी मुंबई : श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, गौरीसह पाचव्या व सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ नैसर्गिक आणि १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. अशाच प्रकारे अनंत चतुर्दशी दिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व १६३ विसर्जन स्थळांवर अधिक काळजी घेण्यात येत आहे.

अनंत चतुर्दशी दिनी सर्व २२ विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून ७६२ स्वयंसेवक, ३९० लाईफगार्डस्‌ व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा-सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही लावण्यात आले असून पोलीस विभागाचे याद्वारे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे.

श्रीमूर्ती विसर्जनाकरिता सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळी ४० मध्यम आणि ८ मोठ्या तरापयांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर १ फोर्कलिपट, क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गणेशभक्तांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती आणि पुजा करता यावी यादृष्टीने रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे.

विसर्जन स्थळांपैकी तलाव व्हिजन अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गौरी तसेच श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या आवाहनास उत्तम सहकार्य केले आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना आणि स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे आणि गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले आहे.

विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे. मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक असे सुके निर्माल्य स्वतंत्र कलशात टाकावे. कोणत्याही परिस्थितीत सदर वस्तू पाण्यात टाकू नयेत, अशा महापालिकेच्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून निर्माल्य महापालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाद्वारे वाहून नेले जाऊन त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे आणि खाद्य वस्तू गरजु मुलांना आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या मंचावरुन विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणेच नागरिकांच्या मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले असून अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्जन सोहळ्याकरिता महापालिका आणि पोलीस विभाग यांच्या मार्फत सर्वतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे. नागरिकांनी विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी आरोग्य मेळाव्याचे आयोजन