हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशावर किरकोळ कारणावरुन चौघा मारेक-यांचा जिवघेणा हल्ला
पनवेल महापालिकेच्यावतीने ७ सप्टेंबर रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन
महापालिकेच्या खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेलमधील इंडियन स्वच्छता लीग 2.0 च्या रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
पनवेल : केंद्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रगतीशील पनवेल टीम, “इंडीयन स्वच्छता लीग २.०” या स्पर्धेमध्ये सहभागी असुन सदर स्पर्धेमध्ये सहभागी आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिक यांना सहभागी करुन घेण्यासाठी पनवेल जनजागृती करण्याच्या दृष्टीने आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेलमध्ये या चारही प्रभागांमध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. चारही प्रभागामधील रॅलीला दहा हजारुन अधिक संख्येने उपस्थित तरुणांचा,नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
पनवेलमध्ये महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव या मार्गावरती ही रॅली काढण्यात आली. यावेळीआमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषचे वडील संदिप घोष ,उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त डॉ.वैभव विधाते ,लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे, माजी नगराध्यक्ष हमीदसईद मुल्ला , रनथाॅन सायकलिंग क्लबचे सदस्य, सीकेटी महाविद्यालय, याकुब बेग, छोटा कांदा, काळसेकर महाविद्यालय,बांठिया शाळा,सीकेटी इंग्लिश मिडीयम शाळेचे विद्यार्थी, गुड माॅर्निग रंग क्लबचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की आयुक्तांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व टीम वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून दाखवत आहे. प्रत्येक बाबतीत महापालिका आघाडी घेत आहे. प्रगतीशील पनवेल बनण्यामध्ये नागरिकांचे सहकार्यही महत्वाचे आहे. नागरिकांनी अस्वच्छता करणाऱ्यांना रोखल्यास आपला परिसर स्वच्छ राहील,चांगल्या सवयीतूनच पनवेल शहर अधिक अभिमानाने सर्वांच्या समोर जाईल.
यावेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, शहरातील सर्व नागरिकांच्या श्रमदानामुळे, योगदानामुळे आज पनवेलचा विकास झाला आहे. या स्वच्छता रॅलीचा उद्देश मनपाचे कर्तव्य आणि नागरिकांनी त्यांची जबाबदारी समजून घेणे आहे. हा संदेश समाजघटकातील प्रत्येकापर्यंत पोहचला पाहिजे.
या रॅलीची सांगता ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वडाळे तलाव येथे झाली. या ठिकाणी सर्व उपस्थितांनी एकत्रितरित्या राष्ट्रगीताचे गायन केले. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वडाळे तलावावरती सेल्फी पॉईंट ची निर्मिती महापालिकेमार्फत करण्यात आली होती. याचा सुद्धा आनंद अनेक उपस्थितांनी घेतला.
इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत समिती "ब" कळंबोली मधील रॅली उपायुक्त कैलास गावडे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे , प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनिल पाटील उपस्थितीत काढण्यात आली.
सदर रॅलीमध्ये KLE कॉलेज, सुधागड शाळा, महाराष्ट्र शाळा, बारकुबाई शाळा, दादासाहेब लिमये कॉलेज, सामाजिक संस्था व रोडपाली रहिवासी संघ, नागरिक, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता दुत, प्रभाग समिती 'ब. चे कर्मचारी एकूण रॅलीमध्ये १००० लोकांचा सहभाग घेऊन रॅलीची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीमध्ये से.१२ म्हसोबा तलाव परिसराची लोक सहभागातून साफसफाई मोहीम घेण्यात आली.
खारघर प्रभागामध्ये इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत अतिरीक्त आयुक्त भारत राठोड उपायुक्त गणेश शेटे यांच्या उपस्थितीत उत्सव चौक ते ग्रामविकास भवन स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीचा शेवट ग्रामविकास भवन येथील बाजारपेठेमध्ये नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करुन झाला. नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कामोठे प्रभागामध्ये इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत उपायुक्त अभिषेक पराडकर, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत शंकर मंदिर तलाव ते लोकनेते दि.बा.पाटील मैदान असे स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सुषमा पाटील, एम एन आर, लोकनेते रामशेठ ठाकूर शाळा, राॅबिनहुड आर्मी, प्रभाग कार्यालयाचे कर्मचारी,स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
या सर्व रॅलीमधील उपस्थितांना महानगरपालिकेमार्फत इंडियन स्वच्छता लीग चा लोगो असणारे टी-शर्ट, टोपी यांचे वाटप करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे फलक व इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले विशेष झेंडे यामुळे ही रॅली खूपच खुलून दिसत होती.चारही प्रभागाच्या रॅलीमध्ये उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
यावेळी महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र तसेच उपस्थितांना प्रमाणपत्र देऊन सर्व प्रभागातील रॅलीची सांगता करण्यात आली. यामध्ये प्रत्येक प्रभागातील स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ रुग्णालय यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.