महापालिका मुख्यालयात अभियंता दिन साजरा

नवी मुंबईच्या प्रगतीत अभियंत्यांचा महत्वाचा वाटा -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : देशाच्या विकासात अभियंत्याचे फार मोठे योगदान असून नवी मुंबईच्या प्रगतीतही अभियंत्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यवत केले.

अभियंता दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित विशेष समारंभात आयुक्त राजेश नार्वेकर मनोगत व्यवत करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय देसाई, माजी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, व्याख्याते विवेक मेहेत्रे, विक्रांत भालेराव आणि विविध विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर एम. विश्वेश्वरय्या यांचे कर्तृत्व आभाळाएवढे मोठे असून त्यांच्या जयंतीप्रमाणेच आज रायगड किल्ल्याची बांधणी करणारे शिवकालीन अभियंते हिरोजी इंदुलकर यांचाही स्मरणदिन आहे. सदरचा अभियंत्यासाठी दुहेरी सुयोग आहे. सर विश्वेश्वरय्या यांनी सिंध प्रांतापासून कर्नाटकपर्यंत आपल्या आगळ्यावेगळ्या कामाने कर्तबगारी सिध्द केली असून पुण्यातून अभियंत्रिकी पदवी संपादन करुन पुढेही धुळे शहराचे रचनाकार आणि इतर अनेक लोकोपयोगी कामांतून त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव योगदान दिले असल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.  

वाचलेले प्रत्यक्ष अंमलात आणण्याची संधी अभियंत्यांना मिळते. समाजाच्या दृष्टीने अभियंत्याविषयी आदर वाढविणारी गोष्ट असून नवी मुंबई महापालिकेतील अभियंत्यांनी नव्या जगातील विकासाच्या गतीसोबत काम करुन एकविसाव्या शतकातील शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक कायम राखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे आयुक्तांनी गौरवपूर्वक सांगितले. यापुढील काळात होणाऱ्या विमानतळ, सागरी लिंक रोड, डाटा सेंटर अशा नानाविध अत्याधुनिक प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या नागरी सुविधांवर ताण येणार असून त्यादृष्टीने सुविधांची क्षमता वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून यामध्ये अभियांत्रिकी विभागाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा अभियांत्रिकी विभागाचा रिस्पांन्स टाईम अत्यंत कमी असल्याने नागरिकांच्या मनात महापालिकेबद्दल निर्माण झालेला विश्वास अधिक उत्तम काम करुन उंचावण्यासाठी आपले अभियंते यापुढील काळात अधिक तत्पर राहतील, अशी खात्री यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली.

शहर अभियंता संजय देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात १९९२ साली महापालिका स्थापन झाली त्यावेळी चार इंजिनिअर्सने सुरुवात केल्यानंतर पुढे राष्ट्रीय पातळीवर मानांकित होण्यापर्यंतच्या केलेल्या प्रगतीशील वाटचालीचा धावता आढावा घेतला. आज महापालिकेचे नियोजनबध्द शहर म्हणून कौतुक होते. यामध्ये संपूर्ण कालावधीतील अभियंत्यानी  दूरदृष्टीने केलेल्या कामाचे महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. महापालिकेचे पहिले प्रशासक एम. रमेशकुमार यांच्या शिस्तीचा प्रभाव अजुनही आमच्यावर आहे असे सांगत संजय देसाई यांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन काम करण्यासाठी अभियांत्रिकी विभाग सज्ज असल्याचे निग्रहपूर्वक सांगितले.

यावेळी डॉ. विक्रांत भालेराव यांनी पर्यावरण विषयक अत्याधुनिक कामांविषयी माहितीप्रद व्याख्यान दिले. तसेच विवेक मेहत्रे यांनी ‘चॅट जीपीटी आणि आर्टिफिशिअल इन्टॅलिजन्स-अभियंत्यासाठी तारक की मारक' या विषयाच्या अनुषंगाने नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देत प्रबोधन केले.

उपअभियंता विवेक मुळे यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे चरित्र वाचन केले. तसेच उपअभियंता विश्वकांत लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे यांनी आभार मानले.

अभियंता दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता अरविंद शिेदे, अजय संखे, सुभाष सोनावणे, गिरीष गुमास्ते, मदन वाघचौडे, संजय भय्यासाहेब पाटील, संजय पाटील, विजय राऊत, मनोहर सोनावणे, संजय खताळ, शुभांगी दोडे, सुनिल लाड, प्रवीण गाडे, सुधीर जांभवडेकर, संजय पाटील आणि उपअभियंता, शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘इंडियन स्वच्छता लीग' अंतर्गत स्वच्छ चित्रकला स्पर्धा