‘सिडको'तर्फे ‘महाराष्ट्र भवन'चे सादरीकरण

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने मुहुर्त स्वरुप

नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन व्हावे या गेल्या अनेक वर्षापासून करीत असलेल्या मागणीला खऱ्या अर्थाने मुहूर्त स्वरुप आले आहे. नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांची १२ सप्टेंबर रोजी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात बैठक पार पडली. सदर बैठकीला ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक-१ डॉ. कैलास शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक-२ शंतनु गोयल उपस्थित होते.

या बैठकीत वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भवन'च्या वास्तुचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे ‘महाराष्ट्र भवन'चा प्रश्न मार्गी लागून अशी वास्तू प्रथमच ‘महाराष्ट्र'मध्ये उभी राहणार आहे. लवकरच आकार घेणारी ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू कशी असेल ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मनाला खूप समाधान मिळाले. ‘सिडको'ने आराखडा केल्याप्रमाणे ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू उभी राहिल्यास अशा प्रकारची वास्तू संपूर्ण देशात नसावी, अशी भावना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.

 ‘महाराष्ट्र भवन'ची प्रस्तावित वास्तू १४ मजल्यांची असून या ‘भवन'च्या प्रथम दर्शनी भागामध्ये ‘महाराष्ट्र'चे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांवा भव्यदिव्य पुतळा असणार आहे. या सुंदर अशा ‘महाराष्ट्र भवन'मध्ये अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रुम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता विश्रांती रुम असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्री, कॉनफरन्स हॉल, फुड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल भविष्यात ‘महाराष्ट्र भवन'मध्ये पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर संबंधित अधिकारी वर्गाचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले आहेत.

नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्य निहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करुन दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहुन नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र, जागा नसल्याने आणि हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधताना दिसतात. ज्या ‘महाराष्ट्र भवन'साठी सन २०१४ पासून माझा लढा चालला होता, त्याला आज पूर्णविराम लागला आहे. या ‘महाराष्ट्र भवन'चा फायदा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार आहे. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आयुष्मान भव' मोहिमेचा शुभारंभ