‘इंडियन स्वच्छता लीग'साठी नवी मुंबई सज्ज

आपण सर्वजण कचऱ्या विरोधातील लढाई जिंकू -आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग २.० स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षी देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक युवक सहभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त नवी मुंबई शहर आपला पहिला नंबर कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याअनुषंगाने ‘नवी मुंबई इको नाईट्‌स' या नवी मुंबई शहराच्या संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते १२ सप्टेंबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१७ सप्टेंबर या ‘राष्ट्रव्यापी सेवा दिन'चे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर ‘इंडियन स्वच्छता लीग'चे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून ‘युथ वर्सेस गार्बेज' अर्थात ‘कचऱ्याविरोधातील लढाईत युवकांचा सहभाग' असे ध्येय नजरेसमोर ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत असे अभिप्रेत असल्याचे सांगत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिका या स्पर्धेसाठी सज्ज असून मागील वर्षीपेक्षा आपण अधिक उत्तम कामगिरी करु अशी खात्री दिली. मागील वर्षी देशभरातील १८०० शहरे यामध्ये सहभागी झाली होती. यात नवी मुंबईला सर्वाधिक युवक सहभागाचा बहुमान लाभला होता. यावर्षी ४ हजारहुन अधिक शहरे सहभागी झाली असून सदरचे आव्हान मोठे असले तरी आपण त्यामध्ये यशस्वी होऊ, असा विश्वास नवी मुंबईकर स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साहाच्या बळावर आयुक्तांनी व्यक्त केला.

‘नवी मुंबई'चे भूषण असलेले जगप्रसिध्द संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन ‘नवी मुंबई इको नाईटस्‌ संघ'चे कर्णधार असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण कचऱ्याविरोधातील लढाई जिंकू, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ठामपणे सांगितले.

‘इंडियन स्वच्छता लीग' अंतर्गत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बोधचिन्ह अनावरण, १३ सप्टेंबर रोजी सोसायट्यांना भेटी देत स्वच्छताविषयक जनजागृती, १४ सप्टेंबर रोजी तृतीयपंथीय नागरिकांमार्फत अभिनव पध्दतीने स्वच्छता जनजागृती तसेच स्वच्छताकर्मींची दहीहंडी, १५ सप्टेंबर रोजी एकाच वेळी नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये लाखो
विद्यार्थ्यांची स्वच्छ चित्रकला स्पर्धा, १६ सप्टेंबर रोजी मॉलमध्ये जनजागृती त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर रोजी सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात त्या त्या ठिकाणच्या मध्यवर्ती स्थळी स्वच्छतेचा सामुहिक शपथ ग्रहण कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी आणि स्वच्छतेची लाट सर्वत्र पसरावी यादृष्टीने १७ सप्टेंबर रोजी बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात निश्चित केलेल्या ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८ वाजता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्याच्या कार्यक्रमांची आखणी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेली आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षक, युवक, लोकप्रतिनिधी, महिला बचतगट आणि महिला मंडळे यांचे सदस्य, विविध
प्रकारच्या संस्थांचे सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी-सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभागी व्हावे आणि स्वच्छ नवी मुंबई शहराप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'तर्फे ‘महाराष्ट्र भवन'चे सादरीकरण