गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश जारी

पनवेल : रायगड जिल्ह्यात १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात १ लाख २ हजार खासगी तर २७१ सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६६ वर अवजड वाहनांना वाहतूक बंदीचे आणि वाहतूक नियोजनाचे दिनांक निहाय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असून पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात आणि सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना, नियोजन पूर्ण केले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा-सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गणेश उत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरु असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सव साठी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क झाले आहे.

गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, १० सुविधा केंन्द्र, १० क्रेन, ॲम्ब्युलन्स, एकूण वॉर्डन ४५०, होमगार्ड १०० नेमण्यात आले आहेत. यासह खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगांव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी, पोलादपूर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती आणि टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैदयकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन आणि त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना बंदी आदेश लागू राहतील. यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तसेच २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर  रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तसेच २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ पासून ते ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत.  यासह २०, २२, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिवसा वाहनांना बंदी घातण्यात आली असून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरुन अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही.

या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस,  पाच दिवस, सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे २८ सप्टेंबर रोजी आणि २१ दिवसाचे गणपती १० ऑक्टोबर २०२३ रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. यातील समुद्रावर ५२ गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये १०५, नदीमध्ये २४४, तलावामध्ये १०० आणि इतर ठिकाणी ९४ गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे . या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाकडून सुविधा नियोजन-उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात २७१ सार्वजनिक गणपती आणि १,०२,५८१ खाजगी गणपतींची स्थापना होणार आहे.  

२८ रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद सण साजरा होत आहे. रायगड जिल्ह्यात  नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरिता पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी-कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी आणि एटीसी यांचे पथक नेमण्यात आले असून सोशल मिडीया देखरेख करण्याकरिता सायबर सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका, मोहल्ला कमिटी बैठका घेण्यात आल्या आहेत. - डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी-रायगड. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘डाकघर'साठी जागा देता का?