शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नाव-नोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नाव-नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ असा आहे.

राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज http://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती ‘सांस्कृतिक कार्य विभाग'चे प्रधान सचिव विकास खारगे आणि ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी'चे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.
राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन आदि समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदि सामाजिक कार्य, शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदिंबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता) अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उप-जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या ‘समिती'चा अध्यक्ष असेल. याशिवाय या ‘समिती'मध्ये शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील. तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडीओग्राफी आणि कागदपत्र जमा करुन घेतील. ‘जिल्हास्तरीय समिती'कडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हिडीओसह ‘राज्य समिती'कडे सादर करेल.

अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक ८१६९८८२८९८, ०२२-२४३१२२९५६ / ०२२-२४३६५९९० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ६) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्यान उघडण्याची-बंद करण्याची वेळ वाढवण्याची ‘काँग्रेस'तर्फे मागणी