रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा!
सारसोळे येथे कोलवानी देवी, दर्याराजाची आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून मनोभावे पुजा
नवी मुंबई : आगरी-कोळी बांधवांचा खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय. समुद्राचा कोप होऊ नये, मासेमारी करताना होड्या सुरक्षित रहाव्यात आणि समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमा दिनी समुद्राची पुजा करुन समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करत असतात. नारळी पौर्णिमा सणाचे औचित्य साधून ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सारसोळे गांव येथील कोलवानी देवीचे दर्शन घेऊन दर्याराजाची मनोभावी पुजाअर्चना केली. माझ्या आगरी-कोळी बांधवांच्या मासेमारी धंद्याला भरभराट येऊ दे! अशी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आई एकविरा देवी आणि दर्या राजाला प्रार्थना केली.
याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुरज पाटील, समाजसेवक मनोज मेहेर, अमोल मेहेर, गणेश भगत, सुर्यकांत तांडेल, चाहु मढवी तसेच असंख्य ग्रामस्थ आणि महिला वर्ग पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होत्या.
आगरी-कोळी बांधव पारंपारिक पध्दतीने वेशभूषा परिधान करुन ‘नारळी पौर्णिमा'चा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव विशेषतः कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरा करत असतात. समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवांचाच येत असल्याने सदर सण मोठ्या उत्साहाने कोळीवाड्यांमधे साजरा होत असतो. मुळातच कोळीबांधव उत्सवप्रीय नारळी पौर्णिमा त्यांचा अत्यंत प्रिय सण आहे.
‘नारळी पौर्णिमा'चा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारीक पध्दतीने साजरा करीत असतात. कोळी बांधव आपला पारंपारीक वेशभूषा परिधान करतात. कमरेला रुमाल, अंगात टी-शर्ट आणि डोक्याला कोळी टोपी तर स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करुन अक्षरशः सोन्याने मढतात. कोळी समाजातील स्त्रीया कायमच सोन्याचे भरपूर दागिने अंगभर घालत असल्याने सामान्यांना कायमच त्याचे अप्रुप वाटत आले आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.