४१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन
‘कौशल्य विकास विभाग'द्वारे दीड वर्षात ३ लाख तरुणांना रोजगार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी मुंबई : ‘कौशल्य विकास विभाग'च्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता-नाविन्यता विभाग' अंतर्गत ४१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता-नाविन्यता विभाग' मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., ‘व्यवसाय-प्रशिक्षण संचालनालय'चे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावीत यांच्यासह ४१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने यावेळी उपस्थित होते.
आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. नव्याने सुरु झालेल्या ७५ आभासी क्लासरुम आणि सुरु झालेल्या अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यवत केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया-डिजीटल इंडिया'ला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील ‘कौशल्य विकास विभाग'मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरुणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन ‘आयटीआय'मध्ये विविध ९०० कोर्सेस शिकवले जात असल्याची अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळेच आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. हीच बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र.