मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त डॉ. मृण्मयी भजक यांनी गुंफले तिसरे पुष्प

नवी मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नवी मुंबई महापालिका तर्फे विविध कार्यक्रमांचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना अधिकारी, कर्मचारीवृंदाचा तसेच नवी मुंबईतील साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या वर्षीच्या पंधरवड्यातील तिसरे कार्यक्रमपुष्प गुंफतांना लेखिका, निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ‘अमेरिका खट्टी मीठी' या एकपात्री सादरीकरणातून मराठी चष्म्यातून अमेरिकेचे आंबट-गोड दर्शन घडविले.

नाट्य अभिवाचन स्वरुपात दृष्क-श्राव्य माध्यमातून साकारलेल्या या कार्यक्रमातून उपस्थितांना सभागृहात बसून अमेरिकेची सफर घडली. अमेरिकेतील सेंट जोसेफ गावात निवेदिकेचे वास्तव्य, तेथील निसर्गाच्या बदलांचे होणारे परिणाम, तिथल्या स्त्रियांच्या भावनांचे हिंदोळे, स्त्रियांना खूप मूले असण्याचा वाटणारा अभिमान, लग्नाशिवाय होणाऱ्या संततीला स्वीकारणारा समाज, जोडीदार सोडून गेल्यानंतर आलेले एकलेपण अशा विविध भावावस्था डॉ. मृण्मयी भजक यांनी उत्तम अभिनयातून आणि अभिवाचनातून प्रभावीपणे साकारल्या.

भारतीय असण्याविषयीची अमेरिकन माणसाची ओढ आणि त्यातून फूल इंडियन, हाफ इंडियन ते अगदी पाव इंडियन असे भारतीयत्व सांगण्याची तेथील माणसांची असोशी माडतांनाच आपला देश सुटतो. पण, परदेश आपला होतो का? ते माहीत नाही असा विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून सदर अभिवाचनाची मैफल सरली.
ड्रेसच्या खिशात शिल्लक राहिलेली अमेरिकेतील मिशीगन किनाऱ्यावरील पांढरी शुभ्र वाळू जरी अमेरिकन आठवणी जाग्या करत असली तरी इकडे परतल्यानंतर आपला देशच बरा अशी संवेदना अधिक तीव्रतेने जाणवते असे सांगत डॉ. मृण्मयी भजक यांनी अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करीत अमेरिकेची जिंदादील सफर घडविली.

सुप्रसिध्द साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘अमेरिका खट्टी मीठी' या पुस्तकाच्या बर्ल्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, आत्मकथन अमेरिकेकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंब कन्येचे आहे याची प्रचिती देणारा कार्यक्रम डॉ. मृण्मयी भजक यांनी सादर केला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त यापुढील चौथा उपक्रम महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या वक्तृत्व स्पर्धेचा असून ‘भारतीय संविधान'च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘माझे संविधान-माझा अभिमान' या विषयावर २३ जानेवारी २०२४ सकाळी ११ पासून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.
याशिवाय २५ जानेवारी रोजी आपल्या आवडत्या कवीच्या कवितेचे सादरीकरण करण्याची संधी महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाला ‘परकाव्यवाचन' स्पर्धेतून मिळणार असून याशिवाय ‘स्वच्छ नवी मुंबई-पर्यावरणशील नवी मुंबई' या विषयावर घोषवाक्य, चारोळी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या तिन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ परकाव्यवाचन स्पर्धेनंतर २५ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.

या मधील परकाव्यवाचन स्पर्धेसाठी अधिकारी-कर्मचारी यांनी आपली नावे नोंदणी तसेच घोषवाक्य, चारोळी लेखन स्पर्धेतील काव्याचे लिखित स्वरुपातील सादरीकरण २३ जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत माहिती-जनसंपर्क विभागात करावयाचे आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘उत्सव अयोध्याचा, आनंद चिरनेरकरांचा'