स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत नवी मुंबईत मंदिर स्वच्छता

नवी मुंबई : शहर स्वच्छतेला अधिक गतिमानता आणि प्रभावीपणा प्राप्त करुन देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सखोल स्वच्छता मोहीम नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत सुचित केल्याप्रमाणे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतावेळी वाशी आणि कोपरखैरणे विभागातील प्रसिध्द मंदिरांना भेटी देऊन स्वच्छता मोहीमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड सहभागी झाले. तसेच वाशी, सेवटर-६ मधील जागृतेश्वर शिव मंदिर येथे माजी नगरसेवक दशरथ भगत, फशीबाई भगत आणि ‘देवस्थान ट्रस्ट'चे पदाधिकारी-सदस्य त्याचप्रमाणे पावणे गांव येथील पावणेश्वर मंदिर परिसराच्या स्वच्छतेत माजी नगरसेवक शशिकांत भोईर आणि ‘मंदिर ट्रस्ट'चे पदाधिकारी-सदस्य सहभागी झाले होते. त्यासोबतच या मोहिमेत आपापल्या क्षेत्रात वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोर, त्यांचे कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी तसेच कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे, त्यांचे कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी सहभागी झाले होते.

यावेळी मंदिर व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांंशी संवाद साधत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांस मंदिराच्या अंर्तगत आणि बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. तसेच मंदिराचे वातावरण पवित्र राखण्यासाठी स्वच्छतेची गरज अधोरेखित केली. या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिकेने मंदिर आणि परिसर स्वच्छतेत पुढाकार घेतला असला तरी या पुढील काळात अशा प्रकारची स्वच्छता नियमितपणे राखली जाईल, याकडे मंदिर व्यवस्थापनाने काळजीपूर्वक लक्ष देण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. तसेच सर्व धार्मिक स्थळांना टाकाऊपासून टिकाऊ संपत्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने फुले, प्रसाद अशा निर्माल्याची पावित्र्य राखून विल्हेवाट लावावी. थ्री आर तत्वांचे पालन करावे. त्याचप्रमाणे २० आणि २१ जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व मंदिरावर तेथील व्यवस्थापनामार्फत विद्युत रोषणाई केली जाईल याकडे महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांनी लक्ष द्यावे, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्फत सूचित करण्यात आले.

नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक वाढविण्यामध्ये मंदिरे आणि प्रार्थनास्थळे यांची स्वच्छता एक महत्त्वाचा घटक आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी होत प्रार्थना स्थळांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच सर्वांचा उत्साह देखील वाढविला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पुजेचा मान