संपूर्ण राज्यात सर्वंकष स्वच्छता मोहिम टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्धार

स्वच्छता मोहिम व्हावी लोकचळवळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : सर्वंकष स्वच्छता अभियान (#DeepCleanCampaign)मुख्यमंत्र्याचे किंवा महापालिकेचे अभियान नसून ते जनतेचे अभियान आहे. स्वच्छता अभियान न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे. सर्वंकष स्वच्छता मोहिम मुंबई, मुंबई महानगर, एमएमआरडी क्षेत्र असे करीत टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची (#DeepCleaningCampaign)  सुरुवात ३० डिसेंबर रोजी वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आले. वागळे परिसरातील १८० ठिकाणी सकाळी ६.३० वाजता या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबतच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर,  ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक अशोक वैती, एकनाथ भोईर, योगेश जानकर, डॉ. जिंतेद्र वाघ, माजी नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, शिल्पा वाघ, मनिषा कांबळे, महापालिका अधिकारी-कर्मचारी, ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अनिरुध्द बापू सेवा मंडळ, संत निरंकारी सेवा मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, विविध महाविद्यालयांमधील एन.एस.एस, एन.सी.सी. चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

या अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झाले होते. तीन हात नाका वरुन मॉडेला नाका मार्गे वागळे मुख्य रस्ता, १६ नं. येथील बीएमसी पाईपलाईनवरील पुल, रोड नं. २१, रोड नं.२२ येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरु असलेल्या स्वच्छतेची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः हातात झाडू घ्ोवून रस्त्यांची सफाई केली. तसेच फुटपाथवर पाण्याची फवारणी करुन फुटपाथ स्वच्छ केले.

सदर अभियानात सहभागी झालेल्या भजनी मंडळ, स्वच्छता स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, एन.सी.सी, एन.एस.एस, शालेय विद्यार्थी तसेच विविध धार्मिक संस्थामार्फत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागोजागी संवाद साधला.

जिथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाही. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे. त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा. यानंतर त्याचे दृश्यस्वरुप नागरिकांना दिसेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होवू नये यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी ‘स्वच्छता अभियान'चे ठाणे महापालिकेने केलेले नियोजन उत्कृष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विशेषतत्वाने नमूद केले. तर सफाई कर्मचारी जयेश गायकवाड आणि अनिता  शिरसाट यांचा प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'ला वागळे मधून प्रारंभ झाला असून दर शनिवारी एक या प्रमाणे येत्या २४ फेब्रुवारी २०२४ पर्यत प्रत्येक प्रभाग समितीत अंतर्गत अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात मार्केट, गल्ल्या, बस स्थानके, फुटपाथ, डिव्हायडर, नाले, मैदाने, कचरा पडणारी ठिकाणे, विसर्जन घाट अशी सर्व सार्वजनिक ठिकाणांचा समावेश केला आहे.

दरम्यान, ‘स्वच्छता अभियान'मध्ये महापालिकेचे २५००कर्मचारी, १७९७ स्वच्छता कर्मचारी, विविध संस्थाचे स्वयंसेवक यासह ५ हजारांहून जास्त नागरिक सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सफाई केली जात आहे. सफाईसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री, टँकरसेवा त्यांना पुरविण्यात आल्या आहेत. पाईपलाईन परिसराची साफसफाई, वागळे परिसरातील ११६ सार्वजनिक शौचालयांची सफाई होणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादरीकरणात नमूद केले.

ठाणे मधील प्रदुषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत. जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करुन शहरात जंगले (Urban forst) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.
-ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आशियातील सर्वात मोठ्या वलस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपुजन